संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित आणि विडिओ सहित – sant dnyaneshwar maharaj haripath

संत साहित्याच्या मध्यामातून आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित उपलब्ध करत आहोत, सर्व भाविक भक्तांनी याचा आनंद घ्यावा याबद्दलचे आपले मत कमेंट बॉक्स मध्येहरिपाठ टाका.



देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणें ।
द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥४॥

अर्थ:

देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्यानें सलोकतादि चारी मुक्तींचा लाभ होतो. हे सकृद्दर्शनी असंभाव्य वाटतें, परंतु द्वारीं उभे असणें म्हणजे ‘सेवकाच्या नात्यानें तत्पर असणे’ असा अर्थ घेतला पाहिजे.श्रीतुकोबारायांनी (सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेद काम सांडोनिया ॥ ) परमप्रितीनें भगवन्नामोच्चार करणें हीच हरीची सेवा आहे असे सांगितलें आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदांत ‘हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा’ असें द्विरुक्तीनें सांगण्यांत हरीचे नामस्मरण हेंच देवाचें द्वार असे सुचविले आहे. ‘क्षणभर या पदाचा अर्थ ‘अति अल्पकाल’ असा घ्यावा. अत्यल्पकाल देखील हरिनामोच्चारणरूप सेवा केली असतां चारी मुक्तीचा लाभ होतो, असा पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे.

देवाचें मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचें तादात्म्य सोडणें व अंतर्मुख वृत्तीनें नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ति करणें म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम हेंच देवाचें द्वार सुचविलें त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल, तर हरिनामस्मरण केल्यावांचून चित्तशुद्धि होणार नाही, व चित्तशुद्धि झाल्यावाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेंच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो.

“क्षणभर” ह्याचा लाक्षणिक अर्थ घेतला, तर अनंत जन्मजन्मांतरीच्या दृष्टीने आपले आयुष्य क्षणभर या समानच आहे. अशा दृष्टीनें क्षणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ घ्यावा. म्हणून जन्मभर हरिनामस्मरणाचा आश्रय करणारा जो साधक त्याला चारी मुक्तीचा लाभ होतो. ॥१॥

(हरिनामोच्चार करण्यात रत राहण्याविषयीं ध्रुवपदांत मोठ्या अट्टाहासानें सकळ जनांस बोध करीत आहेत) मुखानें ‘हरिनाम घ्या हरिनाम घ्या’ असे द्विवार सांगून त्यापासून अगणित पुण्याचा लाभ होईल असें सांगतात ॥२॥

देह-स्त्री-पुत्र-गृह रूपी संसारात राहूनही जिव्हेला हरिनामाचें प्रखर व्यसन लावून घ्या असे वेदशास्त्रादिक हात उंचावून सांगत आहेत ॥३॥

श्रीमहाराज म्हणतात की, अशा प्रकारचे व्यसन पांडवांनी लावून घेतल्यामुळे त्यांच्या घरी द्वारकाधीश श्रीकृष्णपरमात्मा कसा राबत होता हें श्रीमत् व्यासकृत महाभारतावरून दिसूने येईल. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पहा :-

 


२ 
चहूं वेदीं जाण साहिशास्त्रीं कारण ।
अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम ।
वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥४॥

अर्थ:

चार वेद, सहा शास्त्रें व अठरा पुराणें ही हरीचेंच वर्णन करीत आहेत. ॥१॥

ज्याप्रमाणें दही घुसळून त्यांतील सारभूत लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात, त्याप्रमाणें चार वेद, सहा शास्त्रें व अठरा पुराणें ह्यामध्यें सारभूत असणार्‍या हरीचें तूं विचारानें ग्रहण कर, आणि त्यांतील ताकाप्रमाणें असणार्‍या वांझट कथांचा मार्ग टाकून दे ॥२॥

हरि जो एक आत्मा त्याची व्याप्ति मायोपाधिक शिवामध्यें व अविद्योपासक जीवामध्यें एकसारखीच आहे. त्या हरीला सोडून दुसर्‍या समजण्यास कठीण अशा साधनांमध्यें तूं आपलें मन घालूं नको. (भज गोविंदम् भज गोविंदम भज गोविंदम् मूढ मते ? ) ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरि म्हणजेच वैकुंठ. हरि हे त्या वैकुंठाचें नांव आहे. त्याचेंच मी निरंतर भजन करतों आणि तो मला पाण्यानें भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणें जिकडे तिकडे दिसत आहे. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पहा :-

 



त्रिगुण असार निर्गुण हें सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणांचें अगुण ।
हरिविणें मत व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार ।
जेथुनी चराचर त्यासी भजें ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥४॥

अर्थ:

त्रिगुणात्मक जगत् अशाश्वत व असार आहे. तीन गुणांचे पलिकडे असलेलें निर्गुण निराकार परब्रह्म तेंच शाश्वत व सार होय. ह्या सारासाराचें रहस्य निरंतर हरिचिंतनांत रत असणें हेंच होय. ॥१॥

जे गुणसहित साकार आहे तें सगुण, जें गुणरहित निराकार आहे तें निर्गुण. म्हणजे सगुण तेंच निर्गुण व निर्गुण तेंच सगुण – फक्त गुण तेवढे अधिक वा उणे. कारण हरीची व्याप्ति दोहीतही समानत्वेंकरून आहे. त्या दृष्टीनें कोणत्याही सगुण वस्तुस निर्गुण असें निश्चयानें म्हणण्यास कांही हरकत नाहीं. श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधि नसल्यामुळें त्याच्या स्वरुपाचें ज्ञान नेत्रादिक जड इंद्रियांस होणें शक्य नाही, ह्यासाठी भगवत देहाची मीमांसा करीत न बसतां, भगवत चिंतन करण्यांतच गढून जा. त्यावांचून अन्य विषयांत जर तूं आपलें मन गुंतविशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला असें समज. ॥२॥

जे व्यक्त नसून अमूर्त आहे, ज्यास आकार नाही, व ज्याच्यापासून चर (चेतनयुक्त) व अचर (जड) अशा उभयभावात्मक जगताची उत्पत्ति झाली, त्या हरीचें तूं भजन कर. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानांत व मनांत निरंतर रामकृष्ण आहे व त्यायोगानें या जन्मात अनंत पुण्याईची जोड आहे. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पहा :-



भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति ।
बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।
उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं ।
हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें ।
तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥

अर्थ:

जन्ममृत्युरूप संसारदुःखापासून एक हरीच सोडविणारा आहे, असा दृढ विश्वास असल्यावांचून हरीवर आत्यंतिक म्हणजे निःसीम प्रेम बसणार नाही, व अशा निःसीम भक्तीवांचून संसारांतून मुक्तता केव्हांही होणार नाही असा नियम आहे. ह्यास्तव हरीच्या ठिकाणीं भाव असल्यावांचून भक्ति होईल व भक्तीवांचून मुक्ति मिळेल असें जे म्हणतात त्यांचे तें म्हणणें आपल्या अंगांत कांही एक बळ नसतांना मी अमूक एक शक्तीची गोष्ट करीन असें म्हणण्याप्रमाणें व्यर्थ होय, म्हणून तसें बोलूं नये ॥१॥

देव लवकर कशानें प्रसन्न होईल असा जर तुझा प्रश्न असेल तर कांहीएक व्यर्थ शीण न करतां आपल्या चित्तास विषयवासनेच्या ओढाताणीतून सोडवून स्थीर कर आणि निजबोधानें शांत रहा ॥२॥

देह, पुत्र, स्त्री, गृह, धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयीं व रक्षणाविषयीं प्रापंचिक खटाटोप तूं रात्रंदिवस करीत आहेस, व हरीचें भजन मात्र मुळींच करीत नाहीस तें कां बरें ? ॥३॥

हरीचें भजन कर म्हणजे तूं या संसारसागरांतून तात्काळ तरून जाशील, असें श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पहा :-



योग याग विधी येणें नोहे सिद्धि ।
वायांचि उपाधि दंभधर्म ॥१॥
भावेंवीण देव न कळे निःसंदेह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेवीण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात ।
साधूचे संगती तरुणोपाय ॥४॥

अर्थ:

अष्टांगयोग व यज्ञ याचें यथाविधि आचरण केल्यानें हरीची प्राप्ति होणार नाही. कारण ही सर्व हरि प्राप्तीविषयी बहिरंगे – दूरची साधनें – आहेत. याचें अनुष्ठान करणारामध्यें मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याति व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याचे इच्छेनें तो योग, यज्ञ वगैरे करतो व त्यामुळें खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिकधर्म मात्र होतो. ॥१॥

भावावाचून साधकास देव केव्हांही निःसंशय कळावयाचा नाही, म्हणजे देववचन, गुरुवचन, याच्यावर दृढ विश्वास असल्यावांचून देवाचें निःसंशय ज्ञान होणार नाही. कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेंच होतो; आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरूद्वाराच मिळालेला आहे, म्हणून त्यावांचून देवाचा अनुभव कसा कळेल ? ॥२॥

तपावांचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्यावांचून कांही मिळणार नाही, म्हणजे कर्म करावें तसें फळ मिळतें. हित सांगणारांमध्यें जर गूढ आत्मज्ञान (गुज) नसेल, तर तो काय सांगेल ? कारण आत्मज्ञान होणें हेंच सर्वांचे हित आहे. गुजचा एक अर्थ प्रेम असाही होतो. हित सांगणारांमध्यें जर प्रेम नसेल, तर तो काय जे सांगेल ते कोरडेच. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय, साधूची संगत करणें हाच होय असें माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी ह्यावर क्लिक करा.



साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला ।
ठायींच मुराला अनुभवें ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योती ।
ठायींच समाप्ती झाली जैसी ॥२॥
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला ।
साधूचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं ।
हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं ॥४॥

अर्थ:

साधनचतुष्टय अधिकार्‍यास श्रीगुरुरूपी साधूनी ‘तत्त्वमसि’ ह्या वाक्याचा बोध केल्यावर देहेंद्रियातीत मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो, पण तोही अनुभव स्फुरणरहित ज्ञानरूप ब्रह्मामध्यें नाहीसा होतो, मग तो अधिकारी देहबुद्धीनें, अथवा देहातीत जीवबुद्धीने, अथवा जीवातीत शिवबुद्धीनेही न उरून अवशेष ज्ञानाज्ञानातीत सहज निर्धर्म ब्रह्मस्थितीनें असतो. ॥१॥

जसें कापूररूपी वात अग्नीच्या ज्योतीनें पेटली म्हणजे कापूर व अग्नि ह्यापैकीं कांही एक शिल्लक रहात नाही. ॥२॥

त्याप्रमाणें साधूंच्या अंकित झालेल्या हरिभक्ताची, विद्या अविद्येची निवृत्ति होऊन नित्य निर्धर्म मोक्ष भूमिकेवर प्राप्त होऊन तो परम ऐश्वर्यरूप मोक्षानें सुशोभित होतो. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला साधुसंतांच्या संगतीत असण्यांत गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मतत्त्वरूप हरि दिसत आहे ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी ह्यावर क्लिक करा.



पर्वताप्रमाणें पातक करणें ।
वज्रलेप होणें अभक्तांसी ॥१॥
नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त ।
हरीसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्यां कैंचा दयाळ पावे हरी ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥

अर्थ:

ज्यांनी पर्वतासारखी मोठमोठी पातके केली असून जे हरिविषयींच्या आत्यंतिक प्रेमरूपी भक्तीविषयी विन्मुख आहेत म्हणजे जे अभक्त आहेत, त्यांचे तें पातक कोणत्याही अन्य उपायांनी नाहींसे होत नाही. ॥१॥

ज्याला हरीची प्रेमलक्षणा भक्ति नाही तो पतित अभक्त आहे. तो करंटा हरीचें भजन कसें करील ? ॥२॥

जे वायफळ बडबड करणारे, झोपेंत बरळळ्याप्रमाणें अमर्याद बडबड करतात, असल्यांना दीनदयाळ हरी कसा प्राप्त होईल ? ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व देहामध्यें एक परिपूर्ण असणारा आत्मा हाच कोणी ठेवा मला मान्य आहे, हाच माझें सर्वस्व आहे. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी ह्यावर क्लिक करा.



संतांचे संगती मनोमार्गगती ।
आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्त्वी नाम साधिती साधन ।
द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली ।
योगियां साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥

अर्थ:

आपल्या मनोवृत्तीची धाव संताच्या संगतीकडे लाव, व या साधनानें तूं लक्ष्मीपतीस वश करून घे, म्हणजे संत ज्याप्रमाणें सांगतील त्याप्रमाणें ती गोष्ट मनावर धरून देहानें मनानें तसें वाग. हरीला वश करून घेण्याचें साधन हेंच होय ॥१॥

वाचेने निरंतर रामकृष्णाचा जप करणें हाच जीवाचा धर्म होय. म्हणून मायोपाधिक शिवाचा आत्मा जो राम त्याचें तू भजन कर; अथवा रामजप हाच शिवाचाही आत्मा आहे. अर्थात् जीवानें त्याचें भजन करणें अवश्यच आहे. ॥२॥

एकतत्त्व हरि, त्यास त्याच्या नामरूपी साधनानें जे कोणी प्राप्त करून घेतात, त्यांस मी आणि तूं इत्यादिक द्वैतबंधनाची बाधा होत नाही. ॥३॥

योग्यांना सतराव्या जीवनकलेच्या प्राप्तीमध्यें जें सुख व जी आवड आहे, तेंच सुख व तीच आवड वैष्णवांना हरीचे नामामृत सेवनामध्यें आहे. ॥४॥

बाळपणींच प्रल्हादाचे जिव्हेवर हरीच्या नामाचा उच्चार ठसला व कृष्णासारखा उदार ज्ञानदाता उद्धवाला मिळाला. ॥५॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीचें नाम सर्व पारमार्थिक साधनात सोपें असून तें सर्व मनुष्यांना दुर्मिळ झालें आहे, कारण हरीचें नाम कोणी घेत नाही. त्याची सुलभता व योग्यता जाणून तें नाम सदोदित घेणारा असा पुरुष विरळा आहे. ॥६॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी ह्यावर क्लिक करा.



विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान ।
रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे ॥१॥
उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा ।
रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान ।
नामपाठ मौन प्रपंचाचें ॥४॥

अर्थ:

विष्णूचें नामस्मरणावांचून इतर जप करणारा आणि रामकृष्णस्वरूपीं ज्याचें मन नाही त्याचें ज्ञान व्यर्थ आहे. ॥१॥

जन्माला येऊन द्वैतभावरहित अद्वैत अशा परमात्म्याला जाणण्याचा मार्ग ज्यास माहीत नाही तो हतभागी होय. त्याची वस्ती रामकृष्णस्वरूपी कशी होईल ? म्हणजे रामकृष्णस्वरूपीं ऐक्याला तो कसा पावेल ? ॥२॥

ज्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानानें अहं (मी) इदं (हें) वृत्तिरूपी द्वैताची उत्पत्ति झाली त्या द्वैताचा नाश ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेंच होणार आहे. तें ज्ञान देणारे गुरु आहेत. गुरूवाचून तें कधीही मिळणार नाही; व ज्या साधकाला ते मिळालें नाही, त्याला नामी जो परमात्मा, त्याचें अभेदभजन घडत नाहीं. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हरीच्या सगुणसाकार स्वरूपाचेंच ध्यान आहे, आणि त्याच्याच नामाची मी सतत आवृत्ति करीत असून प्रापंचिक गोष्टी संबंधानें मौन घेतलें आहे. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी ह्यावर क्लिक करा.


१०
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं ।
चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया ।
हरीविण धांवया न पावे कोणी ॥२॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
नामें तिन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें ।
परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥

अर्थ:

हरीच्या नामाकडे चित्त नाहीं आणि गंगा यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम जो प्रयाग त्या प्रयागास जातो, अथवा दुसर्‍या अनेक तीर्थयात्रा करतो, तर त्याचें ते करणें व्यर्थ होय. ॥१॥

जो हरीच्या नामाविषयी विन्मुख आहे, म्हणजे तें नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य पापी होय. त्याला पापातून सोडविण्यास हरीवांचून दुसरा कोण धांव घेणारा आहे ? ॥२॥

भगवंताच्या नामानें पातकांपासून त्रैलोक्याचा उद्धार होतो असें वाल्मीकीने रामायणांत सांगितलें आहे. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामाचें जो भजन करतो त्याच्या सर्व वंशाचा उद्धार होतो. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी ह्यावर क्लिक करा.


११
हरिउच्चारणीं अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥
तृण अग्निमेळें समरस झालें ।
तैसें नामें केलें जपता हरी ॥२॥
हरिउच्चारण मंत्र पैं अगाध ।
पळे भूतबाधा भय याचें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

अर्थ:

हरिनामाचा जप केल्यानें पापाच्या अनंत राशी एका क्षणांत नाहीशा होतात. ॥१॥

गवताचा व अग्नीचा संबंध झाला की तें गवत अग्निरूप होतें, त्या प्रमाणें हरीचा जप निरंतर करीत असलें, म्हणजे जपणारा हरिरूपच होतो. ॥ २॥

हरीच्या नाममंत्राचें सामर्थ्य अपूर्व आहे. त्याचे धाकानें भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजे पिशाच्चबाधा नाहीशी होते, इतकेंच नव्हे, तर जीवाच्या मागे लागलेला पंचभूतात्मक देहाविषयीचा जो अहंकार त्याची देखील बाधा दूर होते; म्हणजे हरिनामानें देहाभिमानाचा नाश होतो. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यथार्थ निर्णय उपनिषदाकडूनही झाला नाही ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी ह्यावर क्लिक करा.


१२
तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी ।
वायांची उपाधी करिसी जनां ॥१॥
भावबळें आकळे येरवी नाकळे ।
करतळीं आंवळे तैसा हरी ॥२॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरी ।
यत्‍न परोपरी साधन तैसें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥

अर्थ:

अहो जनहो, कितीही तीर्थयात्रा केल्या व अनेक व्रतनियमाचें आचरण केलें, तरी हरीवर दृढ विश्वास असल्यावाचून ती सफळ होणार नाहीत, याकरिता तुम्ही हा व्यर्थ शीण कां करतां ? ॥१॥

हरीच्या ठिकाणीं विश्वास ठेवून त्याचें भजन केल्यानें तो परमात्मा तळहातावरील आवळ्याप्रमाणें आपल्या हस्तगत होतो, अन्य उपायांनी तो हस्तगत होणार नाही. ॥२॥

पारा जमिनीवर पडून त्याच्या बारीक बारीक गोळ्या जमिनीवर पसरल्या म्हणजे ज्याप्रमाणें ते पार्‍याचे सर्व कण एके ठिकाणी जमवून हातात घेण्याला पुष्कळ प्रयास पडतात, त्याप्रमाणें हरिनामावांचून इतर साधनांनी भगवत्प्राप्ति होण्याला पुष्कळ कष्ट सोसावे लागतात. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की, माझे गुरु निवृत्तिनाथ हे गुणत्रयापलीकडील निर्गुण आहेत. त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझ्या हातामध्यें दिला, म्हणजे त्यांनी केलेल्या बोधानें माझ्या बुद्धीस पूर्ण अनुभव झाला. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी ह्यावर क्लिक करा.


१३
समाधि हरीची सम सुखेंवीण ।
न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें ।
एका केशवराजे सकळ सिद्धि ॥२॥
ऋद्धि सिद्धि निधि अवघीच उपाधी ।
जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥३॥
ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान ।
हरीचें चिंतन सर्वकाळ ॥४॥

अर्थ:

सृष्टींतील लहान मोठे वगैरे भेदरूपी वैषम्य विचारानें काढून शिवापासून तृणापर्यंत एकरूपानें वास्तव्य करणार्‍या हरीचें समबुद्धीनें ग्रहण केलें असता समाधि (आत्मस्थिति) प्राप्त होते. जर बुद्धींतील सजातियादि भेद गेले नसतील तर भेदात्मक बुद्धीस हरीची समाधि कधींही प्राप्त होणार नाहीं . ॥१॥

केशवास (आत्म्यास) यथार्थत्वेंकरून जाणणें हेंच बुद्धीचें ऐश्वर्य आहे, यावांचून दुसरें नाही. त्यानेंच जगातील सर्व सिद्धींचा लाभ होतो. ॥२॥

ऋद्धि म्हणजे ऐश्वर्य, सिद्धि म्हणजे अणिमा गरिमा इत्यादि अष्ट प्रकारच्या सिद्धि, यांचा निधि म्हणजे ठेवा प्राप्त झाला, तरी जोपर्यंत परमानंदरूप हरीच्या ठिकाणीं मन नाही, तोपर्यंत त्या पीडादायकच आहेत. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्राणिमात्राला रमविणारें असें समाधान माझे ठिकाणीं सुस्थिर झालें असून हरीचें चिंतन सर्वकाळ चालले आहे. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी ह्यावर क्लिक करा.


१४
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥
रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप ।
पापाचे कळप पळती पुढें ॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
पाविजे उत्तम निज स्थान ॥४॥

अर्थ:

खर्‍या अपरिमित हरीचा जप निरंतर करणाराकडे कळिकाळ दृष्टीनें देखील पहात नाही. ॥१॥

वाचेनें निरंतर रामकृष्णाचा जप केल्यानें तपाच्या अनंत राशी घडतात व त्या योगानें पापाचे समुदायचे समुदाय पुढें पळून जातात. ॥२॥

हरि, हरि, हरि हा शिवाचा नित्य जप करण्याचा मंत्र आहे. या मंत्राचे जे कोणी वाचेनें ग्रहण करतील त्यास मोक्षाची प्राप्ति होईल. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी निरंतर नारायणनामाची आवृत्ति करतों, त्यायोगें देहत्रयातीत अति उत्तम आत्मस्वरूप स्थानाची मला प्राप्ति झाली आहे. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी ह्यावर क्लिक करा.


१५
एक नाम हरि द्वैतनाम दूरी ।
अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥१॥
समबुद्धि घेतां समान श्रीहरी ।
शमदमां वरी हरि झाला ॥२॥
सर्वांघटी राम देहादेहीं एक ।
सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४॥

अर्थ:

जो एका हरीचेंच नाम जाणतो, दुसरें (द्वैताचें) नाम ज्यापासून दुरावलें गेलें आहे, म्हणजे दुसर्‍या नांवाची ज्याला ओळखच नाहीं, जो सकळ सृष्टि हरिरूप पाहून हरिनामच सकळ सृष्टपदार्थात ओळखतो, असा एखादाच असतो. ॥१॥

जीव ईश, जीव जड, ईश जड, जीव जीव, आणि जड जड असे बुद्धींतील पांच प्रकारचें भेद विचारानें नाहीसे करून समबुद्धीनें भेदशून्य श्रीहरीचें जो ग्रहण करतो, तो शमदमाचा वैरी म्हणजे साधकाला शमदमाच्याही बंधनातून सोडविणारा जो हरि तद्रूप होतो. ‘शमदमावरी’ असा पाठ घेतला तर दुसरा अर्थ असा होतो :- शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे बाह्येंद्रियनिग्रह, ते करून वर सांगितलेल्या पाच प्रकारच्या भेदवैषम्याच्या बुद्धींतून निरास करून समबुद्धीनें सर्व ठिकाणी समान हरीचें जो ग्रहण करतो तो स्वतः हरि होतो. ॥२॥

सर्व देहामध्यें एकच व्यापक राम आहे. पहा, हजार किरणांतून तेजोरूपी एक सूर्यच भरलेला असतो, म्हणजे त्या हजार किरणांचा प्रकाशक एक सूर्यच असतो. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आपले चित्तामध्यें सर्वकाळ हरीचेंच चिंतन करण्याचा नियम केला आहे. त्या योगानें मागील (या जन्माचे, मागाहून येणारे, पुढचे) जन्म यापासून मी सुटलों. आतां मला पुन्हा जन्म नाही. ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी ह्यावर क्लिक करा.


१६
हरिनाम जपे तो नर दुर्लभ ।
वाचेसी सुलभ राम कृष्ण ॥१॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली ।
तयासी लाधली सकळ सिद्धि ॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले ।
प्रपंची निमाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा ।
तेणें दशदिशा आत्माराम ॥४॥

अर्थ:

ज्याच्या बुद्धीमध्ये हरिचिंतनाचा जप चालू आहे आणि ज्याच्या वाणीमध्यें सुलभ रामकृष्णनामाचें वास्तव्य आहे असा मनुष्य फारच दुर्लभ असतो. ॥१॥

ज्यांनी रामकृष्णनामाच्याच भजनानें संकल्पविकल्पात्मक मनरहित अशा निर्विकल्प सहज परमात्मस्थितीचा लाभ करून घेतला, त्याला परिपूर्ण परब्रह्मसिद्धि प्राप्त झाली अथवा त्याला जगांतील सर्व सिद्धि प्राप्त झाल्या. भगवत्‍चिंतनानें बुद्धीला सिद्धि प्राप्त होते, म्हणजे बुद्धीचे मल दूर होऊन तिची उत्तम सिद्धि होते, देहतादात्म्यानें पंचविषयाच्या भोगात गुंतलेल्या व त्रिविधतापानें तप्त झालेल्या प्रापंचिक जीवांची शांति साधूंच्या संगतीनें होते ॥२-३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामचिंतनानें माझ्या हृदयांत रामकृष्णस्वरूपाचा ठसाच उमटला आहे. त्यायोगानें दाही दिशांमध्यें आत्माराम भरलेला भासत आहे. ॥४॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


१७
हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥
मातृ पितृ भ्रातृ सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें ।
निवृत्तीनें दिधलें माझें हातीं ॥४॥

अर्थ:

हरीचा जप करून वाणीनें हरीची कीर्ति जो गाईल त्याचा देह पवित्र होईल. ॥१॥

हरिनामसंकीर्तनाच्या सामर्थ्यानें ज्यानें अगणित तप केलें तो अनंत कल्पपर्यंत वैकुंठांत वास्तव्य करतो. ॥२॥

व आईबाप, भाऊबंद तसेच त्यांचे अनेक गोत्रज ही सर्व मनुष्ये चतुर्भुज होऊन वैकुंठी राहतात; म्हणजे त्यांना सरूपतामुक्तीचा लाभ होतो. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अति गुप्त आत्मज्ञानाचा लाभ माझे गुरु निवृत्तिनाथ यानी माझे हातीं दिल्यामुळे मी ज्ञानसंपन्न झालों. ॥४॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


१८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन ।
हरिविण सौजन्य नेणे कोणी ॥१॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें ।
सकळही घडलें तीर्थाटण ॥२॥
मनोमार्गें गेला तो तेथें मुकला ।
हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥४॥

अर्थ:

जो हरिवंशपुराण वाचतो, आणि यथार्थ हरिनामाचें कीर्तन करतो व हरिवांचून दुसरें कोणीही प्रिय जाणत नाही, त्या मनुष्याला वैकुंठाचा लाभ झाला आणि त्याला सर्व तीर्थयात्रा घडल्या असें समजावें. ॥१-२॥

मनोवृत्तीप्रमाणें वागणारा असल्या लाभाला आचवतो. हरिभजनामध्यें जो स्थिर झाला तोच धन्य होय. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनामाच्या लाभाचीच मला गोडी असून मला सतत रामकृष्णस्वरूपींच आवड आहे. ॥४॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


१९
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
पापें अनंत कोटी गेलीं त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचें तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठी ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठी ॥३॥
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म ।
हरीविण नेम नाहीं दुजा ॥४॥

अर्थ:

हरिनामाच्या कीर्तनाची वैष्णव जनांनी जोड केलेली असते, त्यायोगानें त्यांची अनंत कोटी पातकें नाहींशी होतात. ॥१॥

अनंतजन्मी केलेल्या तपांचे फल एक हरीचें नामस्मरण आहे. सर्व साधनामध्यें हरीचें चिंतन हें सुलभ साधन होय. ॥२॥

अष्टांगयोग, यज्ञक्रिया, धर्म व अधर्मरूपी माया ही सर्व हरीच्या चिंतनानें लयाला जातात. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,आमच्या ठिकाणीं यज्ञ याग, क्रिया, धर्म सर्व काहीं हरि आहे. त्यावांचून दुसरा कांही नेमधर्म नाही. ॥४॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


२०
वेदशास्त्रपुराण श्रुतीचें वचन ।
एक नारायण सार जप ॥१॥
जप तप कर्म हरीविण धर्म ।
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरीपाठी गेले ते निवांताचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र ।
यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥४॥

अर्थ:

सर्वांचे सार एक नारायण आहे, त्याचा तूं जप कर याविषयी श्रुतिस्मृति व शास्त्र यांचे वचन प्रमाण आहे ॥१॥

इतर जपतपादि कर्मे करण्याचे श्रम हरिभजनावांचून व्यर्थ जाणारे आहेत. ॥२॥

ज्याप्रमाणें भ्रमर मकरंद सेवन करण्याचे भरात त्या कमलकलिकेंत सापडला जातो म्हणजे त्याला बाहेर निघून येण्याची शुद्धि रहात नाही, त्याप्रमाणें हरीचे नामस्मरणात रत झालेला साधक हरिस्वरूपी एकमय होतो व त्याचें फिरून प्रपंच परावर्तन होत नाही. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम हाच माझा मंत्र आहे, आणि शास्त्रही पण तेंच आहे, त्याच्या दरार्‍यानें यमानें आमचा कुलगोत्राचा त्याग केला आहे. ॥४॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


२१
काळ वेळ नाम उच्चारितां नाहीं ।
दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण ।
जडजीवां तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची ।
उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ।
पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥

अर्थ:

हरीचें नाम घेण्याला शुद्ध काळ वेळेची जरूर नाही. तें हवें तेव्हा घावे, त्या योगानें आपल्या आईचें कुळ व बापाचें कुळ या दोहोंचाही उद्धार होतो. दुसरा अर्थ :- नाम घेणारा व ऐकणारा या उभयतांचा उद्धार होतो. ॥१॥

रामकृष्णाचें नाम सर्व पापांचा नाश करणारें आहे. याप्रमाणें सर्व पापांचा नाश करून मूर्ख जीवांना तारणारा एक हरीच आहे. ॥२॥

हरीचें नाम हेंच सार आहे. भजन करण्याकडे जिव्हेची ज्यानें योजना केली आहे, त्याचे दैवास उपमा कोणी द्यावी ? ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मजकडून हरीचे चिंतन यथासांग झालें, आता माझ्या पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे. ॥४॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


२२
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ ।
लक्षुमीवल्लभ तयां जवळी ॥१॥
नारायण हरी नारायण हरी ।
भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड ।
गगनाहूनि वाड नाम आहे ॥४॥

अर्थ:

सतत हरीचें नाम घेण्याचा ज्यांचा नियम आहे असे प्राणी दुर्मिळ आहेत. त्यांच्याजवळ लक्ष्मीचा पति विष्णु असतो. ॥१॥

नेहमी नारायण हरि, नारायण हरि, अशा नामाचा जो जप करतो त्याच्या घरीं सर्व ऐश्वर्य व सलोकतादि चारी मुक्ति असतात ॥२॥

जन्मास येऊन जर हरीची ओळख झाली नाही तर त्या जन्मास नरकच समजावें, आणि तो प्राणी यमाचे घरचा पाहुणा होतो म्हणजे यमलोकास जातो, आणि यमाकडून त्याला शासनाचा पाहुणचार मिळतो. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु जे निवृत्तिनाथ, त्यांस हरीचें नाम केवढें आहे असा आपले एच्छेनुरूप प्रश्न केला असतां, त्यावर गुरु निवृत्तिनाथांकडून आकाशापेक्षांही नाम मोठें आहे असें उत्तर मिळालें. ॥४॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


२३
सात पांच तीन दशकांचा मेळा ।
एक तत्त्वी कळा दावी हरी ॥१॥
तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ ।
तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥
अजपा जपणें उलट प्राणाचा ।
येथेंही मनाचा निर्धार असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ ।
रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥

अर्थ:

हा संसार कोणी सात तत्त्वामक आहे, कोणी पांच तत्त्वात्मक आहे, कोणी तीन तत्त्वात्मक आहे तर कोणी दहा तत्त्वात्मक आहे असें मानतात. दुसरा अर्थ : – सात अधिक पांच अधिक तीन अधिक दहा मिळून पंचवीस तत्त्वात्मक संसार मानतात. ही सर्व तत्त्वेंही हरि आपल्या एका चैतन्य तत्त्वावर दाखवतो. ॥१॥

असा तत्त्वविचार करण्यापैकी हरीचें नाम नाही. ते सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. तें घेण्याला काही कष्ट पडत नाहीत. ॥२॥

रात्री व दिवसां मिळून एकवीस हजार सहाशें वेळा सोहं सोहं असा आपले हृदयात प्राणाच्या वरती जाण्यांत आणि अपानाच्या खाली जाण्यात होणार्‍या उभयतांचे भेटीत सहज जप होत असतो, त्यास अजपाजप म्हणतात. संकल्प सोडल्यास (म्हणजे २१६०० श्वास जे होतात त्यांमधून सोहं असा होणारा जप मी करतो असें म्हणून उदक सोडल्यास) साधकाचें मनाचा निश्चय असें करण्याकडे असतो. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणावांचून जगणें मला व्यर्थ वाटतें, म्हणून मी रामकृष्णाच्या भजनमार्गाचें क्रमण केलें आहे, म्हणजे निरंतर हरीचें भजन करीत आहे. ॥४॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


२४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥
जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात ।
भज कां त्वरित भावनायुक्त ॥३॥
ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
वैकुंठभुवनीं घर केलें ॥४॥

अर्थ

जपतपादि कर्मे व अनेक नियमधर्म ज्या भावनेनें करतो त्या भावनेपेक्षां सर्व देहामध्यें एक आत्मारामालाच पाहणें ही भावना शुद्ध आहे. दुसरा अर्थ :- जप, तप, कर्म, क्रिया, नेम धर्म इत्यादि साधनें सर्व भूतांचे ठिकाणी अभिन्नत्वेंकरून परमात्मरूपाला पाहणें, या शुद्ध भावनेच्या पायावर उभारली गेली पाहिजेत. ॥१॥

म्हणून अशा शुद्ध भावाचा त्याग करूं नको. या भावामध्यें बिघाड आणणार्‍या सर्व संशयास फेकून दे, आणि रामकृष्ण नामाचा सारखा टाहो फोडीत रहा. दुसरा अर्थ :- अशा प्रकारचा शुद्ध भाव त्या साधनादिकेंकरून साध्य आहे, तरी त्या साधनानुष्ठानाचे भरात या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये. सर्व संशय टाकून हा शुद्ध भाव वृद्धिंगत होण्याकरितां जीवानें रामकृष्णाचा निरंतर टाहो फोडला पाहिजे. ॥२॥

जातीच्या, पैशाच्या, गोताच्या, कुळस्वभावादि गोष्टीच्या भानगडीत पडूं नको. शुद्ध भावनेनें युक्त होऊन त्वरेनें हरीला जप. दुसरा अर्थ :- या शुद्ध भावनेनें त्वरित युक्त होऊन जातीला, पैशाला व कुळगोत्रजाना तूं भज, म्हणजे जातीस, गोतास, कुळशीलास योग्य अशी कर्में कर, व द्रव्यार्जन, संगोपनादि व्यवहार मोठ्या दक्षतेनें कर म्हणजे अशा करण्यानें प्रापंचिक बाधा होणार नाही. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात मनात नेहमी रामकृष्णाची वस्ती आहे, त्यामुळें वैकुंठलोकीं माझें घर झालें आहे. दुसरा अर्थ :- श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचें घर वैकुंठभुवनांत झालें आहे, म्हणजे वैकुंठरूप हरीचें ठिकाणी आमची वस्ती झाली आहे ॥४॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


२५
जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं ।
हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरी उच्चार नामाचा ।
तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
तें जीवजंतूंसीं केवीं कळे ॥३॥
ज्ञानदेव फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥

अर्थ

भक्त ज्ञानी आहे किंवा अज्ञानी आहे हें भगवंत पहात नाहींत, तर त्यांच्या नामस्मरणानें दोघांनाही सारखीच मुक्ति मिळते. ॥१॥

नारायणहरि या नामाचा उच्चार करणाराकडे कळिकाळाचा प्रवेश होत नाहीं. ॥२॥

हरीच्या यथार्थस्वरूपाचा विचार वेदांनाही कळत नाही. मग तें स्वरूप सामान्य जीवांना कसें जळेल ? ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणानें सर्व मृत्युलोक वैकुंठ केल्याचें फळ मला मिळालें आहे ॥४॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


२६
एक तत्त्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्‍गद जपे आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।
वायां आणिक पंथा जाशील झणी ॥३॥
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरी जपे सदा ॥४॥

अर्थ

हरीचें नाम हेंच तत्त्व आपल्या मनामध्यें बळकट धरा, म्हणजे एकट्या हरिनामाचें मनानें सारखें चिंतन करीत रहा, त्या योगानें हरीला तुझी दया येईल. ॥१॥

राम कृष्ण गोविंद हें नाम सोपे आहे, म्हणून अगोदर तें प्रेमानें घे. ॥२॥

हरीच्या नामाखेरीज जीवाला संसारातून सोडविण्यास दुसरें साधन नाहीं. तूं दुसर्‍या साधनांकडे जाशील तर फसशील. ॥३॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी मौन घेऊन अंतःकरणामध्यें जपमाळ धरून निरंतर श्रीहरीचा जप करीत आहे. ॥४॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


२७
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी ।
रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वायां येरझार हरीविण ॥२॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णीं संकल्प धरूनी राहे ॥३॥
निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी ।
इंद्रियांसवडी लपूं नको ॥४॥
तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करीं ॥५॥

अर्थ

साही शास्त्रांनी हरीच्या नामांत सर्व सुखमाधुर्य आहे असें निवडून ठरविलें आहे. (देह हा सादर पहावा निश्चित । सर्व सुख येथें नाम आहे) त्याचें नेहमीं तूं सेवन कर, अर्ध घटका देखील रिकामा राहूं नको. ॥१॥

कारण देहादिक संसार व त्यातील व्यवहार सर्व खोटा आहे, म्हणून हरीला सोडून या संसाराच्या मोहांत राहशील तर तुझी जन्म-मरणाची येरझार व्यर्थ होईल. ॥२॥

म्हणून हरिनाममंत्राचा तूं निरंतर जप करीत जा, या योगानें तुझ्या अनंत पापांचा नाश होईल, याकरितां रामकृष्णनाम घेण्याविषयींचा निश्चय तूं आपल्या मनाशी पक्का करून रहा. ॥३॥

गुरूजवळ श्रवण, मनन व निदिध्यासनाचा अभ्यास करून तिन्ही देहांतून व तिन्ही गुणाहून वेगळा जो आत्मा तो मी आहे अशी वृत्ति उत्पन्न कर व त्या योगानें सर्व मायाजाळाचा नाश कर. इंद्रियांच्या तादात्म्यात लपून बसू नको. ॥४॥

तीर्थव्रतांच्या ठिकाणी तू विश्वास ठेव व नेहमीं दया बाळग; कारण जेथें शांति दया असतात तेथें देवाची वस्ती असते, म्हणून तूं आपल्या हृदयांत शांति दया ठेवून तेथें श्रीहरि वस्तीला येईल असें कर. ॥५॥

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


२८
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस ।
रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं ।
होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥
असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन ।
उल्हासें करून स्मरण जीवी ॥३॥
अंतकाळीं तैसा संकटाचें वेळीं ।
हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥
संतसज्जनानीं घेतली प्रचीती ।
आळशी मंदमती केवीं तरें ॥५॥
श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ ।
तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥

हरिपाठातील हा शेवटचा अठ्ठाविसावा अभंग फलश्रुती सांगणारा आहे. काही लोक हरिपाठाचे सत्तावीसच अभंग मानतात. पण ज्ञानेश्वरमहाराजांच्या हरिपाठाचे अभंग अठ्ठावीसच आहेत. “अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस” असे ज्ञानेश्वरमहाराजांनी स्वतः या अभंगात सांगितले आहे. त्यामुळे अठ्ठाविसावा अभंग कोणता हा प्रश्नच उपस्थित होत नाही. परमात्मा अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे. ही युगे कधी सत्तावीस अथवा एकोणतीस होणार नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

या संदर्भात जुने व्यावलि विटंकी उभा ही नामदेवमहाराजांची विठोबाची आरती, तसेच ‘युगे झाली अठ्ठावीस । अजूनी का न म्हणली बैस॥’ हा तुकाराममहाराजांनी पुंडलिकाला केलेला खडा सवाल लक्षात घेण्याजोगा आहे. बाह्यातः पाहिल्यास सूर्याच्या बारा कळा व चंद्राच्या पंधरा कळा आहेत. या सत्तावीस कळांवर व्यवहार चालतो, परमार्थ नाही. परमार्थात चंद्राची सोळावी कळा आहे. सोळा आणि बारा मिळून अठ्ठावीस. म्हणून परमात्मा अठ्ठावीस युगेच उभा आहे व हरिपाठाचे अभंग हेही अठ्ठावीसच आहेत.

चंद्राची सोळावी कला भगवान शंकरांनी आपल्या मस्तकी धारण केली आहे. ही सोळावी कला जर चंद्राच्या पंधरा कळांत मिसळली तर सारे विश्व ब्रह्मरूप होऊन तेथे व्यवहारच राहणार नाही. शंभर नंबरी सोने जर पाहिले तर माणूस वेडा होतो. असे सोने बाजारात येतच नाही. जरा कमी कस असला म्हणजेच व्यवहार होतो. ‘बारा सोळा जणी हरीसी नेणती’ अशी अवस्था असल्याने, त्या रात्रंदिवस फिरत आहेत आणि या जीवनाच्या गतीच्या परिश्रमणामुळे जीवाचे बाहेर भ्रमण चालू आहे. या बारा-सोळांचे जर ऐक्य झाले तर अनाहत नाद होतो आणि त्या नादानुसंधानात आत्मसाक्षात्कार होतो असा महीपतींचा अनुभव आहे.

बारा सोळा जणी गडे गं बारा सोळा जणी, मिळोनी येती गलका करिती मशी गेल्या घेऊनी ” या पदांत महीपती ज्याला “गलगा” म्हणतात तो चैतन्याचा ध्वनी आहे आणि तो अठ्ठावीस कलांतून प्रगट झाला आहे. या बारा-सोळांचे ऐक्यातून श्रीहरीची अनुभूती आहे, हे स्पष्ट करणारा हा हरिपाठ असल्याने, याचे अभंग अठ्ठावीसच आहेत याबद्दल कोणताही संदेह रहाणार नाही. ज्ञानदेवांनी हरिपाठाचे हे अभंग ‘ज्ञानादेव तु कैवल्यम्’ अशा विश्वासाने रचले आहेत.

‘विश्वासाने’ रचले म्हणजे कुणी रचले, हे तुकाराम महाराजांच्या पुढील अभंगावरून लक्षात येते : – “विश्वास तो देव । म्हणूनी धरियेला भाव ॥ माझी वदवितो वाणी । जेणे धरिली धरणी ॥ जोडिली अक्षरे । नव्हती बुद्धीची उत्तरे ॥ तुका म्हणे झरा । आहे मुळीचाच खरा ॥” अहो, विश्वास हाच देव आहे; त्याने जसे स्फुरवले – वदवले – तसे ते उतरले गेले आहे. ते काही ‘र’ ला ‘ट’ आणि ‘ट’ ला ‘र’ असे जोडून केलेले बुद्धिचातुर्य नाही. तर ही अजोड अक्षराची जोड आहे. ‘अ’ म्हणजे नाही ‘ क्षर’ म्हणजे नाश; म्हणून ज्याला नाश नाही अशा अक्षराची ही जोड आहे.

पुढील कडव्यात ज्ञानेश्वरमहाराज सांगतात, “नित्यपाठ करी इंद्रायणी तीरी । होय अधिकारी सर्वथा तो” नित्य अशा हरिपाठाचा नित्य पाठ केला असता, तो सर्वथा अधिकारी होतो. परमार्थ करण्याचा अधिकार सर्वांना आहे, कोणाला आहे कोणाला नाही असा प्रकार येथे नाही. ‘ ‘सकळांसी येथे आहे अधिकार” ही तुकोक्ती सर्वांना अधिकार देत आहे.

नाम घ्यायचा अधिकार दिला, पण नाम घ्यायचे कोणी ? आम्ही घेतो का ? “जो रसनेंद्रिया अंकिला । का निद्रेसी जीवे विकला । तो नाही येथ म्हणितला । अधिकारिया ॥” असे ज्ञानेश्वरी सांगते.

जेवणे आणि झोपणे यांशिवाय आम्ही काही करीतच नाही. मग कुठला अधिकार आणि कुठले काय ? नित्य हरिपाठाचे नित्य पठणाने योग्य तो अधिकार प्राप्त होतो. हे पठण कसे व्हावयास हवे हे ज्ञानेश्वरमहाराज पुढील कडव्यात सांगतात, “असावे स्वस्थचित्त एकाग्र मन । उल्हासे करुन स्मरण जीवी ॥” स्वस्थ चित्ताने एकाग्र होऊन आल्हादाने अगदी जीवापासून स्मरणपूर्वक हरिपाठाचे पठण व्हायला पाहिजे. तर तो जीव परमार्थाचा अधिकारी होतो.

पुढील कडव्यात ज्ञानेश्वरमहाराज सांगतात, “अंतकाळी तैसा संकटाचे वेळी । हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥” हरिपाठ करणाऱ्या माणसाचे अंतर्बाह्य रक्षण अंतकाळी तसेच संकटाचे वेळी हरी करतो. अंतकाळी आपणाला कोण सोडवितो ? सगळे जण बाजूने हातपाय मारतात; पण धारेला कोणी पडत नाही. एका परमात्म्याशिवाय अन्य कोणीही आपल्याला सोडवत नाही.

‘ तुका म्हणे तुज सोडविना कोणी । एक चक्रपाणी वाचोनिया ॥ ” ही तुकोक्ती हीच गोष्ट स्पष्ट करते. अंतकाळी व संकटाचे वेळी हरी रक्षण करतो याची प्रचीती नित्य हरिपाठाचे नित्यश्रवण करणार्‍यांनी घेतली आहे. जे साधनांचा आळस करणारे आहेत, त्यांना ही प्रचीती कशी येणार, हा प्रश्न आहे. हीच गोष्ट ज्ञानेश्वरमहाराज पुढील कडव्यात सांगत आहेत : – “संतसज्जनांनी घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवी तरे ॥”

आता हरिपाठाच्या शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या कडव्यात ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, । श्रीगुरुनिवृत्ति वचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ” हरिपाठ रचल्यावर ज्ञानेश्वरमहाराजांनी तो आपले सद्गुरु निवृत्तिनाथमहाराज यांना दाखविला. तेव्हा निवृत्तिनाथांना फार आनंद झाला. त्यांनी धन्योदगार काढले आणि प्रत्यक्ष सद्‌गुरूंनी कौतुक केल्यामुळे ज्ञानेश्वरमहाराजांना अत्यंत संतोष झाला.

(संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित)


tags:- sant dnyaneshwar maharaj haripath meaning  – sarth dnyaneshwar haripath in marathi

video – haripath dnyaneshwar – हरिपाठ ज्ञानेश्वर – संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ – सार्थ ज्ञानेश्वर हरिपाठ

27 thoughts on “संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित”

  1. नाना देशपांडे निलंगा

    हरी हरी हरी हरी धन्यवाद माऊली जय श्री हरी

  2. हृषीकेश बबनराव बाहेकर

    धन्यवाद खूप खूप धन्यवाद हरिपाठ अर्थासोबत दिल्यामुळे. जय जय रामकृष्ण हरी। ??

  3. करतरी आवळे हरी जैसा
    याचा अर्थ आपण शब्दश केला आहे.
    आपण त्याचा गर्भित अर्थ सांगितला नाही.

  4. खूप खूप खूप खूप आनंद झाला धन्यवाद

  5. NARAYAN PANDHARINATH SURVASE

    JAI JAI RAM KRISHNA HARI THANK YOU VERY MUCH FOR MAKING AVAILABILITY OF MAULICHA HARIPATH ONLINE AVAIALABLE ….
    HARI MUKHE MAHANA…..

  6. राम कृष्ण हरी माऊली, खूप छान अर्थ सांगितला…आणि आपल्या कार्याला अगदी मनापासून सलाम…

  7. राजेंद्र कुंभार

    ???रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ???

  8. रमेश इंगळे

    धन्यवाद माऊली। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। 13/4/2024

  9. ha arth apan sangitlela khara arth nahi. karan lakshyarth arth khup vegala ahe. thik ahe pan kahi ka hone pan arth dila tari.

  10. Dnyanraj Suresh Telang

    राम कृष्ण हरी….खूप छान लिहिलं आहे…एक सांगायचंय 27 व्यां अभंगात शेवटची दोन कडवी नाहीत…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *