श्री एकनाथषष्ठी

श्री एकनाथषष्ठी

श्री एनाथषष्ठी बद्दल संपूर्ण माहिती वाचा.


संत या दोन अक्षरी मंत्राने सर्व पापे पळून जातात, षडरिपूंचा नाश होतो, संत सेवेचा महिमा अद्‌भुत आहे. त्यांच्या कृपेने तिन्ही लोकांत कीर्ती होते, मुक्ती मिळते. तन-मन-धन संताला अर्पण करतात, तेव्हा सद्‌गुरुंचा साक्षात्कार होतो. निर्गुण, निराकार अशा परम तत्वाचा साक्षात्कार जो शिष्याला करून देतो, तोच संत होय. जो शास्त्राचे उत्तम अध्यन करतो, त्याप्रमाणे स्वतः आचरण करतो आणि शिष्यांना त्याचा उपदेश करून त्यांनाही आचरणाला प्रवृत्त करतो, त्यालाच संत असे म्हणतात. असे हे संत म्हणजेच एकनाथ महाराज. नाथांचे कर्तृत्व सर्वश्रुतच आहे. नाथांचे वडील सूर्यनारायण, आजोबा चक्रपाणी! नाथांचा सांभाळ या आजोबांनीच केला. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्यामुळे त्यांच्या नशिबी पितृसुख नव्हते, वडिलांचे छत्र ढळल्यावर आजोबांनीच नाथांवर संस्कार केले ते काय प्रतीचे होते ते तुम्ही सारे जाणताच. नाथांचे पणजोबा म्हणजे संत भानुदास हे स्वतः वारकरी होते. शके १५२१ फाल्गुन वद्य षष्ठीला एकनाथ महाराजांनी समाधी घेतली म्हणून या षष्ठीस नाथषष्ठी म्हणतात. नाथांच्या आयुष्यात या षष्ठीला फार महत्त्व आहे. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन, नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह, जनार्दन स्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या सगळ्या गोष्टी या एका तिथीला झाल्या. नाथांनी संसार करून परमार्थ केला. एकनाथी भागवत ही भगवंताच्या अकराव्या स्कंदावरील टीका प्रसिद्ध आहे, ज्ञानेश्र्वरीची मूळ प्रत मिळवून ती शुद्ध करण्याचे कामही एकनाथांनी केले. स्पृश्य, अस्पृश्य हा भेद नाथांनी कधीही मानला नाही. काशीहून रामेश्वराला न्यायच्या कावडीतील गंगेचे पाणी नाथांनी तहानेने तळमळणार्‍या गाढवाला पाजले.

ज्या नाथांच्या घरी साक्षात ईश्र्वराने श्रीखंड्या बनून पाणी भरले त्या नाथांच्या घराण्याचा हा कुलवृत्तांत. एकदा नाथ गोदावरीवरून स्नान करून येत होते. एक यवन त्यांच्यावर थुंकला. नाथांनी परत जाऊन आंघोळ केली. तो परत थुंकला, असे नाथांनी त्या दिवशी 108 वेळा स्नान केले. शेवटी वन थकला. नाथांनी क्षमा मागून त्याला नाथ म्हणाले, ‘वेड्या, मी तुझा आभारी आहे. तुझ्यामुळे मला आज 108 वेळा गोदावरी स्नान घडले.’ काय हा संगम! नाथषष्ठीला भानुदास, एकनाथ नाम घोषणांच्या गदारोळाने पैठणचा आसंत भरून जातो. समाजाच्या सर्व थरात परमार्थ शिरावा यासाठी नाथांनी फार खटाटोप केला. नाथांचे समाजावर असे अपार उपकार आहेत म्हणून नाथषष्ठीचा उत्सव गावोगाव होतो. नाथषष्ठी म्हणजे फाल्गुन पक्षात येणारी षष्ठी तिथी एवढाच या षष्ठीचा अर्थ नाही तर एकनाथ महाराजांच्या जीवनात या सहा महत्त्वाच्या घटनांनी त्यांची त्यांच्या सद्‌गुरुशी झालेली एकरूपता जणू सिद्ध होत आहे. परामर्थ सफल व्हावयाचा असेल तर 6 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. 1 शिष्य, 2 गुरु, 3 सेवा, 4 उपदेश, 5 ज्ञान, 6 कृतार्थता प्राप्त झाली म्हणजे गुरुचे गुरुपण संपते. शिष्याचे शिष्यपणा संपते व दोघांचे एकाच तिथीला म्हणजे एकाच क्षणात निर्वाण होते. गुरु आणि शिष्य एकरूप होतात. नाथ षष्ठीमध्ये हे सहा योग एकत्र येतात. षष्ठी म्हणजे सहाचा समुदाय. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या षडरिपूंच्या समुदायाने आपल्याला अनाथ केले आहे, दीन केले आहे पण श्रीसंत एकनाथ महाराजांनी या सहांना जिंकले होते म्हणून ते नाथ झाले यालाच नाथषष्ठी म्हणतात.


श्री एकनाथषष्ठी

श्रीएकनाथष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्रीएकनाथमहाराज जलसमाधी दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात.पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या ४७५ दिंडया, “भानुदास-एकनाथ” चा गजर हयामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो. फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी (साधारणत: मार्च महिना) ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते.

षष्ठी षष्ठीच्या दिवशी पहाटे २ वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्रीएकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात नाथवंशजांच्या वतीनं वारकरी व हरिदासी कीर्तनं करण्यात येतात. गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते. सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंडया नगर प्रदक्षिणा करुन गोदाकाठी आपापल्या फडात/मठात विसावतात.

सप्तमी – सप्तमीच्या दिवशी रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते, भारुड सादर केली जातात. सकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तनादींचे आयोजन करण्यात येते. वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते.

अष्टमी – अष्टमीच्या दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते. उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. हे दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो. समाधी मंदिरात पोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळमृदुंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लिन होऊन जातात. मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गुळ आणि लाह्या यांचे मोठेमोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात.

त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकविलेली असते. सूर्यास्तासमयी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्यानं ती हंडी फोडण्यात येते. प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. या तीनही दिवसांमध्ये श्रीएकनाथमहाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात. शिवाय इतरही दिंड्‍या आपआपल्या पध्दतीनं सोहळ्याचा आनंद लुटतात. सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून दिंडया घेवून येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने येथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे. नाथषष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असुन अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठणास येतात.

उत्सवाचा इतिहास –  फा.व.६ ह्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.

पंचपर्व –
१) नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म
२) स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह
३) नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह
४) श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी
५) श्रीएकनाथमहाराज जलसमाधी


श्री एकनाथषष्ठी माहिती समाप्त.

2 thoughts on “श्री एकनाथषष्ठी”

  1. बबन हरि पोखरकर

    श्री संत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज यांची माहिती सुंदर दिली आहे परंतू वाक्य रचना अशुद्ध आहे त्या चुका दुरूस्त करून घ्याव्यात ही नम्र विनंती आहे.
    आपला संतचरणदास
    बबन पोखरकर

  2. चूक लवकरच दुरुस्त करू धन्यवाद माउली??

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *