दीप अमावस्या

दीप अमावस्या

दीप अमावस्या / दिव्याची अमावस्या ||

संध्याकाळी देवासमोर दिवा लावून  “शुभं करोति कल्याणम्”  म्हणून घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यां पिढ्या चालत आला आहे. आता आधुनिक  जगात वि‍जेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो. कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद, पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतिक आहे.

दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले,धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो.

या दिवशी, सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी, फुलांची आरास करावी.सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. कणकेचे गोड दिवे (उकडलेले) बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद कुंकू , फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा.

यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसतेज उत्तमम 
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस.

मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे, प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दिप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.

काही ठिकाणी या दिवशी पित्रृ तर्पण देतात. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात . पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृतर्पण. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते.

गटारी अमावस्या

दीप अमावस्येलाच गटारी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी भरपूर मांस मच्छी खाऊन दारू पिण्याचे आयोजन बरेच लोक करतात. असे करण्याचे कारण शोधल्यास हे लक्षात येते की,या दिवसानंतर पवित्र श्रावण मास सुरू होतो. या महिन्यात बहुतेक लोक कांदा लसूण व अभक्ष्य भक्षण बंद करतात.

श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो हवा कुंद असल्यामुळे पचनशक्तीही कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न पचत नाही.  हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो म्हणून मासे खाणे योग्य नसते. कदाचित यामुळेच श्रावणात एक भुक्त राहणे, नक्त करणे किंवा उपवास करण्याची पद्धत सुरू झाली असावी.

श्रावणाच्या आधीच मनसोक्त खाऊन पिऊन घ्यावे म्हणून बरेच लोक गटारी अमावस्या साजरी करतात पण हे चुकीचे आहे. सध्याच्या काळात तर त्याला फारच जोर आला आहे.  आपण जास्तीत जास्त चांगल्या गोष्टीचा प्रसार करून लोकजागृती केली पाहिजे.

चला तर मग धार्मिक विधींचा योग्य  वैज्ञानिक अर्थ सांगून गैरसमज दूर करूया आणि दिव्याच्या पूजेच्या तयारीला लागूया.

https://www.krushikranti.com/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *