मढी

तीर्थक्षेत्र मढी

तीर्थक्षेत्र मढी – ठिकाण

गर्भगिरीच्या पर्वतावर घाटशिरस नजीक एका दरीमध्ये श्री आदिनाथ हे वृध्देश्वराच्या रुपाने वास्तव्य करीत आहे. वृध्देश्वराच्या पुर्वेकडे ५ कि.मी. अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथाच्या उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ हे विराजमान झाले आहे.

अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडूंगे हे गाव ४२ कि.मी. आहे. तेथून ३ कि.मी. अंतरावर मढी हे गाव आहे. पाथर्डीहून मढी हे गाव १२ कि.मी अंतरावर आहे. मढीपासून श्री मच्छिंद्रनाथ ६ कि.मी., वृध्देश्वर १२ कि.मी. व श्री मोहटा देवी २० कि.मी. अंतरावर आहे. दररोज नगर आणि पाथर्डी बसस्थानकामधून मढीकरिता बसेस आहे. अमावस्या, पौर्णिमेच्या वेळेस जादा बसेसची सोय आहे. त्याप्रमाणे यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बस स्थानकांमधून एस.टी. बसेसची सोय केली जाते. 

नाथ भक्तांची व्यवस्था करण्याकरिता कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी रुमची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे. त्याचप्रमाणे भाविकांची व्यवस्था, सेवा करण्यासाठी कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी सदोदीत वाट पाहत आहे.


नाथांच्या रुपाने अवतार

श्री नऊनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रुपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुध्द नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. 

कानिफनाथ यांनी कानामध्ये जन्म घेतला

कानिफनाथांनी प्रर्दीर्घ काळ नाथसंप्रदायाचे काम केले. धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले. नाथ पंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्हातील मढी या गावी फाल्गुन वद्य(रंगपंचंमी) च्या दिवशी संजीवनी समाधी घेतली. कानिफनाथ मंदिर एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे.

राणी येसूबाई आणि बाळराजे शाहुमहाराज(पहिले) जेव्हा मोगलांच्या वेढ्यामध्ये होते. तेव्हा राणी येसूबाईंनी श्री कानिफनाथस नवस केला होता कि, जर माझ्या शाहुमहाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाच्या सभा मंडप, नगारखाना इ. बांधकाम तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करीन. भक्तांनी दिलेली हाक कानिफनाथांनी ऐकली आणि पाच दिवसांच्या आतमध्ये कानिफनाथाने राणी येसुबाई आणि युवराज शाहुराजे(पहिले) यांची सुखरुप सुटका केली.

तेव्हा हा नवस फेडण्यासाठी राणी येसूबाई आणि शाहुराजे (पहिले) यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार श्री पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत यास मढी येथे पाठवून त्याठिकाणी प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखना, सभामंडप, पाण्यासाठी गौतमी बारव इ. भव्य बांधकाम केले तसेच चैतन्य कानिफनाथाच्या समाधीवर वैदीक पध्द्तीने पूजा व्हावी म्हणून तसेच फाल्गुन वद्य ५ (रंगपंचमी)

या दिवशी भरणांच्या यात्रेची सर्व व्यवस्था पहवी म्हणून छ्त्रपती शाहू महाराजांनी वेद्शास्त्र संपन्न ब्राम्हण श्री गंगाराम दिक्षित उपनान चौधरी काशीकर (वास्तव्य पैठण) यांना इ.स. १७४३ मध्ये सनद दिली या अस्सल ऐतिहासिक पुराव्यावरुन वैदिक पुजेची परंपरा मराठे राजे नाथांच्या समाधीच्या ठिकाणी ठेवीत.

समाधी मंदिरातील पितळी घोडा व सदोदीत तेवणारा नंदादीप सुप्रसिध्द मराठे सरदार कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा बापुराव आंग्रे यांनी अर्पण केलेला आहे. अशाप्रकारे श्री चैतन्य कानिफनाथ गडाचे ऐतिहासीक महत्त्व प्राप्त झाले.


कानिफनाथ गड – मढी

श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे. नंतर सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे. तेथे नाथ विश्रांती करत. समोरच एक होमकुंड आहे नंतर नाथांच्या गादीघराशेजारीच पूर्वेला श्री भगवान विष्णूचे मंदिर आहे. त्यातील भगवान विष्णूची मूर्ती इतरत्र कोठेही पहावयास मिळत नाही.

इतके अप्रतिम लावण्य त्या मूर्तीमध्ये आहे जणू काही श्री मोहनीराजच तेथे अवतरल्यासारखे वाटते. मंदिराशेजारीच श्री हनुमंतरायाची मुर्ती आहे. ती मुर्ती पाहुन भक्तांनी प्रभुकार्य करण्यासाठी सदोदित दक्ष राहिले पाहिजे असा संदेश हनुमंतरायांची मूर्ती देते.

नंतर समाधी मंदिराच्या दक्षिणेला नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री मच्छिंद्र्नाथ यांचे मंदिर आहे. तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छिंद्र्नाथाच्या मंदिराचे दर्शन भक्तांना मिळते. समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल-रखूमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे. जेथे जाण्याकरीता भुयार आहे व तो एक पूर्वीच्या स्थापत्यशात्राचा आदर्श नमूना आहे.

त्या साधना मंदिरामध्ये शिवलिंग व नंदी आहे व तेथे असलेल्या खिडकीमधून गार हवा येते व गावाची पश्मिमेकडील पाहणी करता येते. विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथाचे मंदिर व पारायण ठिकाण आहे. समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानीमातेचे मंदिर असून तेथे डाळींबीचे झाड आहे.

त्याला भक्त जणांनी पूर्वी नाथभक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने संबोधतात व त्या डाळींबीच्या झाडाला भक्त काही तरी संकल्प नवस करुन नाडा(धागा) बांधतात व श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पावून भक्तजणांच्या व्यथांचे निर्दालन करतात. श्री समाधी मंदिरामध्ये श्री नाथांची संजीवन समाधी असून, श्री कानिफनाथांची मनमोहक अशी संगमरवरी दगडाची मुर्ती तसेच नाथांचे वाहन असलेला व कान्होजी आंग्रेनी दिलेला पितळी घोडा व दत्तत्रयाची मुर्ती आहे.

तसेच गडावर नगारखाना, बारदारी, भव्य सभा मंडप, पाण्याची टाकी तसेच श्री समाधी मंदिरावरील असलेला प्रचंड कळस व त्यावरील भगवान शंकराचा त्रिशूल हे मुख्य आकर्षण आहे. याच त्रिशूलाला भक्तगण यात्रेमध्ये काठ्या लावून आनंद उपभोगतात. मढी गावामध्ये हनुमंतरायाचे मंदिर अतिशय प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे श्री भैरवनाथ, श्री दत्त यांचे मंदिरदेखील भक्तांना पावणारी आहे. मढी गावाच्या पूर्वेकडून श्री पवनगिरी नदी वाहत आहे. तेथे नाथ भक्त आवर्जुन भेट देतात.

नाथ मंदिराच्या दक्षिणेला एक मोठा पाझर तलाव आहे. त्या तलावाला अर्धी भिंत ही नैसर्गिक आहे. त्या भिंतीवर श्री आदिमाया तुळजापुरची भवानी माता यांचे मंदिर असून तेथे त्यांचे वास्तव्य आहे. या मंदिराच्या उत्तरेला श्री मच्छिंद्रनाथांचे छोटेसे मंदिर आहे. त्याला “लहान मायबा” या नावाने संबोधतात त्याच प्रमाणे गावाच्या दक्षिणेला गर्भगिरी पर्वताच्या रांगा आहेत.

त्यांमध्ये एक दर्या आहे. त्याला लेण्यार्दच्या दरा म्हणतात. लेण्यार्दच्या दर्याशेजारीच दुसऱ्या दऱ्यामध्ये एक प्रचंड अशी दगडाची गोटी असून तेथे गावकऱ्यांतर्फे प्रत्येक वर्षी गोवर्धन पुजा होते. तसेच या दर्यामध्ये एक ३ ते ४ मीटर खोलीचा गोसाव्यांचा झरा आहे. या झ्ऱ्याचे वैशिष्ट्ये असे आहे की हा झरा कितीही दुष्काळ पडला तरी याचे पाणी आटत नाही किंवा कमी होत नाही. परिसरातील गर्भगिरी पर्वत हा श्रावण महिन्यामध्ये पाहाण्याजोगा असतो. तसेच मढी गावामध्ये दोन छोट्या व एक मोठी बारव आहे. 

फ़ाल्गुन वद्य पंचमीला (रंगपंचमील) मढीला कानिफनाथांची यात्रा भरते. या यात्रेला साधारणतः १० ते २० लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आदी प्रांतांमधून येतात. अठरा पगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे. तेथे त्यांच्या भांडणाचा न्यायनिवाडा होतो. पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचे गाढवाचा बाजार भरतो. मढीची रेवडी तर प्रयेकाची आवडीची आहे. पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व धन्य होतात.


नाथ संप्रदाय

नाथ संप्रदाय म्हंटला कि प्रामुख्याने समोर येतो तो म्हणजे हठयोग आणि शाबरी विद्या. नाथांनी मांडलेले तत्वज्ञान हे पिंड – ब्रम्हांड, नाद – बिंदू, पंच तत्वे इत्यादी शी निगडीत होते. नाथ संप्रदाय हा अनेक उप पंथांमध्ये मांडला गेलेला अधल्तो. अखंड भारत तसेच कंधार आफ्घानिस्तान ते नेपाल तसेच इंडोनेशिया मलेशिया पर्यंत याची ख्याती आजहि आहे. अनेक पश्चिमी देशांमध्ये आजही नाथपंथ अति काताक्षपणे आणि तत्वांना धरून त्याचे पालन करण्यात येत आहे. भारताकडून अवघ्या जगाला मिळालेला अमौलिक असा हा “YOGA “, याचा उगम हा नाथ संप्रदायाचा हठ्योगातून आहे.

तीर्थक्षेत्र मढी

नाथसंप्रदाय आणि नवनाथ यांकडे आज आपण सार्वजन फक्त एक दैवी शक्ती म्हणूनच पाहत आहोत. कानिफ्नाथांना प्रबुद्ध नारायणाचा अवतार या व्यतिरिक्त त्यांचा जीवनाचा त्यांचा कर्तुत्वाचा आपल्याला विसर पडले आहे. त्यांचा इतिहास हा धूल खात अनेक ग्रंथांमध्ये दडून बसलेला आहे. कानिफ्नाथान्विशायीच्या काही ठराविक ललित कथां व्यतिरिक्त आज आपल्याला त्यांबद्दल पुरेशी माहिती नाही. त्यांचा जन्म, त्यांचा कार्य, त्यांनी केलेले बंगाली काव्य, त्यांनी लिहिलेले ग्रंथ सामग्री, त्यांची अनेक विद्यान्वारचे प्रभुत्व आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे हठ्योगाला दिलेले योगदान हे सर्व एक गुपित रहस्य बनून आपल्या सर्वान पुढे उपस्थित आहे.

हा इतिहास आज पर्यंत खूप क्वचित इतिहास प्रेमींनी हाताळला अहे. प्रामुख्याने कानिफ्नाथांविषयी अभ्यास खूप कमी झालेलें आढळतो. त्यांची कर्मभूमी हि नेपाल आणि बेंगाल प्रांत असून त्यांनी भारत भ्रमंती करून आणेल शिष्य गोतावळा जमा केलेला आढळतो. आपल्याला सर्वांना मिळून आता हा इतिहास समोर आणायचा आहे. आपल्या नाथांचा जय जय कार तर होताच राहणार पण त्या सोबत त्यांचे चरित्र समोर लवकरच येणार आहे. आणि हे काम आपण सार्वजन मिळून करणार आहोत.

आपण सार्वजन ह्या ऐतिहासिक कामात आपले योगदान देणारच हे साहजिक आहेच. लवकरच आपण एक कानिफनाथ इतिहास संशोधन मंडळाची स्थापना करून आपले काम सुरु करणार आहोत. हि एका प्रकारे नाथांची सेवाच आहे असे भासते. हि सिवा धन किंवा वस्तू रूपात नसून फक्त आपला बहुमोल वेळ खर्ची करणे या स्वरूपाची अश्णार अहे. ज्या इच्छुक अभ्यासू भक्तांना वाटते कि आपण या अभियानात काही मदत करू शकतो त्यांनी कृपया आपले मत कळवावे. हे संशोधन एक ऐतिहासिक संशोधन असून भक्तांच्या भावनांना धक्का लागणार नाही ह्या तत्वावर करण्यात येणार आहे.


संजीवनी समाधी

तीर्थक्षेत्र मढी

श्री क्षेञ मढी येथे श्री चैतन्य कानिफनाथ
महाराजांच्या संजीवनी समाधी आहे


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:wikipedia

12 thoughts on “तीर्थक्षेत्र मढी”

  1. माऊली राऊत

    मला पण माझ्या परीने मदत कारावीशी वाटते

  2. माऊली खुप धन्यवाद तुम्हाला आम्ही तुमच्या सेवेत आहोत

  3. सोमनाथ तळेकर

    खूपच छान माहिती दिली आहे.
    मी मढी ला गेलेलो आहे तेथे जाऊन बसले असता मॅन प्रसन्न होते.
    ।।आदेश।।
    ।।मच्छिंद्रनाथ प्रसन्न।।
    ।।कानिफनाथ प्रसन्न।।

  4. सोमनाथ तळेकर

    खूपच छान माहिती दिली आहे.
    मी मढी ला गेलेलो आहे तेथे जाऊन बसले असता मॅन प्रसन्न होते.
    ।।आदेश।।
    ।।मच्छिंद्रनाथ प्रसन्न।।
    ।।कानिफनाथ प्रसन्न।।

  5. ह.भ.प युवा कीर्तनकार अतुल महाराज माळी मू.शिरपूर ता.शिरपूर.जि.धुळे

    स्द्गुरु

  6. Rohidas kumbhar

    माझा कानिफनाथ बाबांसाठी काय पण

  7. Very few people know about it I had gone up to vridheshwàr temple
    You have given very nice information but it needs more ‘prasar Ani prachar ‘
    Thanks

  8. अशोक का वाघमारे

    माहिती आवडली मला नाथान बदल आनकी माहिती मिळेलका

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *