सार्थ तुकाराम गाथा ७०१ ते ८००

सार्थ तुकाराम गाथा 701 ते 800

सार्थ तुकाराम गाथा ७०१ ते ८००


अभंग क्र.७०१
माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥
बोलविलें तेंचि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥
सोडिलिया जग निंद । मग गोविंद म्हणियारा ॥२॥
तुका म्हणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥३॥

अर्थ

माझा अनुभव तुम्ही पहा,मी देव आपला केला आहे.मी ज्यावेळी देवाला बोलतो त्यावेळी तो लगेच माझ्यापुढे येतो.जग निंदा सोडून दिले म्हणजे गोविंद आपण म्हणेल ते करतो.तुकाराम महाराज म्हणतात मी धैर्‍याने भक्ती करतो म्हणून देव माझ्या मध्ये गुंतला आहे.


अभंग क्र.७०२
मोल देऊनियां सांठवावे दोष । नटाचे ते वेष पाहोनियां ॥१॥
हरीदासां मुखें हरीकथाकीर्तन । तेथें पुण्या पुण्य विशेषता ॥ध्रु.॥
हरीतील वस्त्रें गोपिकांच्या वेशें । पाप त्यासरिसें मात्रागमन ॥२॥
तुका म्हणे पाहा ऐसें जालें जन । सेवाभक्तीहीन रसीं गोडी ॥३॥

अर्थ

नाटकातील वेष धरण करणार्‍यांचे तोंड पाहणे म्हणजे मोल म्हणजे, धन देऊन दोष साठवणे.हरिदासाच्या मुखाने देवाचे चिंतन ऐकणे तेच विशेष पुण्य आहे.नाटकातील लोक हरीचे व गोपिकांचे वेश घेऊ वस्त्र हरणाचे खेळ खेळतात त्यांना तर मोठेच पाप लागते.तुकाराम महाराज म्हणतात असे हे लोक आहेत यांच्या अंगी भक्ती नाही परमार्थाविषयी गोडी नाही देवाची सेवा करण्याचे यांच्या मनात येत नाही.


अभंग क्र.७०३
विठोबा विसांविया विसांविया । पडों देई पायां ॥१॥
बहु खेद क्षीण । आलों सोसुनियां वन ॥ध्रु.॥
बहुतां काकुलती । आलों सोसिली फजिती ॥२॥
केली तुजसाठी । तुका म्हणे येवढी आटी ॥३॥

अर्थ

हे विठोबा तुझ्या ठायी विश्रांती आहे,मला तुझ्या पाया पडू दे.अविद्येच्या वनातील दुःख सुसून मी फार कष्टी झालो.देवा मी खूप काकुलती चालू आहे कारण मी आजपर्यंत खूप फजिती सहन करत इथपर्यंत आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी एवढी आटाआटी तुझ्यासाठी केली आहे देवा.


अभंग क्र.७०४
कां गा धर्म केला । असोन सत्तेचा आपुला ॥१॥
उभाउभीं पाय जोडीं । आतां फांकों नेदीं घडी ॥ध्रु.॥
नको सोडूं ठाव । आतां घेऊं नेदीं वाव ॥२॥
तुका म्हणे इच्छा । तैसी करीन सरसा ॥३॥


अभंग क्र.७०५
तुमची तो भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडेच बोली ब्रम्हज्ञान ॥१॥
आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥
तुम्हां निमित्यासी सांपडले अंग । नेदावा हा संग विचारिलें ॥२॥
तुका म्हणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाचीच होती ॥३॥

अर्थ

हे हरी तुमची मला अजून भेट झाली नाही त्यामुळे मला असे वाटते कि माझ्या मुखातून जे ब्रम्हज्ञानाचे बोल येतात ते अजून कोरडेच आहे.आता मला असे वाटते की,कोणाही संगे न बोलावे व कोणाच्या संपर्कात फार रहू नये.देवा मी ब्रम्‍हज्ञान सांगतो म्हणून तुम्ही असे ठरवले आहे कि काय कि आता तुला दर्शन द्यायची गरज राहिली नाही हे निमित्त साधून माझ्याबरोबर संगच करायचा नाही असेच असे तुम्ही ठरविले आहे काय?तुकाराम महाराज म्हणतात आता मला एकच वासना आहे ती तुम्ही पूर्ण करा,ती वासना म्हणजे तुमच्या दर्शनाची आवड मला आहे ते दर्शन तुम्ही मला द्या.


अभंग क्र.७०६
आहे तेंचि आम्ही मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्ट ॥१॥
न बोलावीं तेची वर्में बरें दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं ॥ध्रु.॥
एका ऐसें एका द्यावयाचा मोळा । कां तुम्हां गोपाळा नाहीं ऐसा ॥२॥
तुका म्हणे लोकां नाहीं कळों आलें । करावें आपुलें जतन तो ॥३॥

अर्थ

हे देवा तुझ्या जवळ जे आहे तेच तर आम्ही मागत आहोत,तरी तू देत नाहीस असा तू क्रियानष्ट होऊ नकोस.तुझ्यावर आम्ही प्रेम करून देखील तू आम्हाला भेटत नाहीस हे वर्म आम्हाला सांगणे बरे दिसत नाही.तुझे हे गुण आम्ही कसे प्रकट करू?आज पर्यंत तुम्ही एका भक्ताचा उद्धार केला मग आता हे गोपाळा तुम्ही दुसऱ्या एका भक्ताचाअव्हेर का?तुकाराम महाराज म्हणतात आजून पर्यंत लोकांना तुझे हे र्दुगुण कळून आले नाहीत त्यामुळे आपल्या ब्रीदाचे रक्षण तू करून घे.


अभंग क्र.७०७
आह्मीं याची केली सांडी । कोठें तोंडीं लागावें ॥१॥
आहे तैसा असो आतां । चिंतें चिंता वाढते ॥ध्रु.॥
बोलिल्याचा मानी सीण । भिन्न भिन्न राहावें ॥२॥
तुका म्हणे आम्हांपाशीं । धीराऐसी जतन ॥३॥

अर्थ

तू आमच्या कडे लक्ष देत नाहीस त्यामुळे आम्ही तुझ्याशी संबंध तोडले आहे कुठे तुझ्या तोंडी लागावे?आता देव आहे तसा असेल त्याच्या विषयी चिंता केल्याने चिंता वाढत जाईल त्यामुळे चिंता करणे सोडून दिले आहे.आम्ही जे काही देवाला बोलतो त्याचा त्रास होतो,त्यामुळे आपण दोघांनी भिन्न भिन्न राहावे हे बरे आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू आमच्याशी कसाही वागलास तरी आम्ही तुझी भक्ती सोडणार नाही.


अभंग क्र.७०८
आम्हांपाशीं याचें बळ । कोण काळवरी तों ॥१॥
धरूनि ठेलों जीवेंसाठी । होय भेटी तोंवरी ॥ध्रु.॥
लागलों तों न फिरें पाठी । पडिल्या गांठी वांचूनि ॥२॥
तुका म्हणे अवकाश । तुमच्या ऐसें व्हावया ॥३॥

अर्थ

देवाचे बळ आमच्यापाशी किती काळ चालणार आहे?जोपर्यंत देवाची आणि आमची भेट होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला आमच्या हृदयात भरून ठेवू.गाठ झाल्या शिवाय आम्ही याची पाठ सोडणार नाहीत तोवर आम्ही देवाच्या मागे फिरणार.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या सारखे होण्यास आजून काही काळ बाकी आहे.त्यानंतर आपले ऐक्य होईलच.


अभंग क्र.७०९
बोलिलेचि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥१॥
बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु.॥
बहुतांच्या भावें वांटिसी भातुकें । बहु कवतुकें खेळविसी ॥२॥
तुका म्हणे ऐसें जाणतसों वर्म । करणें तो श्रम न वजे वांयां ॥३॥

अर्थ

देवाविषयी आत्तापर्यंत मी जे काही बोल बोललो आहे जे काही सांगितले आहे, ते बोल पडताळून पाहिले आता माझ्या मनात कोणतीच शंका राहिली नाही.हे भगवंता तू अनेकांची माय म्हणजे आई आहेस तू कृपाळू आहेस भक्तांच्या मागण्याची कटकट सहन करून तू त्याची आस पुरवितो.तू बहुतांच्या मनातील जाणून त्यांचा भाव जाणून त्यांना तू मोक्ष देतोस.आणि त्यांच्या संगे तू कवतुकाने खेळतोस.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तुझे हे वर्म ठाऊक आहे,त्यासाठी आम्ही पाहिजे ते श्रम घेऊ आम्हला माहित आहे कि ते श्रम वाया जाणार नाही.


अभंग क्र.७१०
कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज ॥१॥
आड कांहीं नये दुजें । फळ बीजें आणिलें ॥ध्रु.॥
उद्वेग ते वांयांविण । कैंचा सीण चिंतनें ॥२॥
तुका म्हणे गेला भ्रम । तुमच्या धर्म पायाचा ॥३॥

अर्थ

हे देवा तुझे स्मरण केल्यावर आता माझ्या प्रारब्धाचा भोग कोठे उरेल?तुझ्या आणि माझ्या मध्ये आता काहीच येणार नाही कारण नामस्मरणाचे बीज चांगल्या प्रकारे फळास आले आहे.तुझ्या चिंतनाने मनातील सारा उद्वेग नाहीसा होऊन गेला.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पावन चरणाने माझा सारा भ्रम नाहीसा झाला आहे.


अभंग क्र.७११
संसार तो कोण लेखे । आम्हां सखे हरीजन ॥१॥
काळ ब्रह्मानंदें सरे । आवडी उरे संचली ॥ध्रु.॥
स्वप्नीं ते ही नाहीं चिंता । रात्री जातां दिवस ॥२॥
तुका म्हणे ब्रम्हरसें । होय सरिसें भोजन ॥३॥

अर्थ

आम्हांला हरिजना सारखे सखे आहेत,म्हणून संसाराकडे कोण लक्ष देतो?आमचा संपूर्ण काळ हा ब्रम्हानंदात जात आहे,त्यामुळे आमच्या हृदयात हरी भक्तीची आवड पूर्ण पणे भरली आहे.स्वप्नातही आम्हाला कसल्याही प्रकारची चिंता नाही.रात्रंदिवस आम्ही सुखी समाधानी आहो.तुकाराम महाराज म्हणतात या हरी भक्तांच्या संगतीने आम्हाला ब्रम्हा रसाचे भोजन दररोज मिळत आहे.


अभंग क्र.७१२
येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥१॥
पडियेलों वनीं थोर चिंतवनी । उशीर कां अझूनि लावियेला ॥ध्रु.॥
काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां ॥२॥
तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे ॥३॥

अर्थ

हे विठ्ठला तू लवकर ये लवकर ये,तुला आळवताना माझा हा प्राण फुटू पाहत आहे म्हणजे प्राण शरीरातून निघू पाहत आहे.मी मोठ्या संसाररूपी अरण्यात पडलो आहे,तू लवकर ये अजून का उशीर तू लावतोस.तुला या लौकिकाची शंका येत नाही का, आपल्या बालकाला सोडून देताना?तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू आम्हाला तुझ्या पासून फार दूर ठेवले आहे यांची खंत आम्हाला वाटत आहे.


अभंग क्र.७१३
आपुले गांवींचें न देखेसें जालें । परदेसी एकलें किती कंठूं ॥१॥
म्हणऊनि पाहें मूळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥ध्रु.॥
पाहातां अवघ्या दिसतील दिशा । सकळ ही वोसा दृष्टीपुढें ॥२॥
तुका म्हणे कोणी न सांगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥३॥

अर्थ

या प्रदेशात(पृथ्वीवर)आपल्या गावाचे(पंढरी क्षेत्रातील वैष्णव) कोणीही मला न दिसेसे झाले,त्यामुळे मी या प्रदेशात एकट्याने किती दिवस काढू?देवा मला तुमचे प्रेमाचे बोलावणे केंव्हा येईल असे झाले आहे.येथे कोणी तरी प्रेमाचा जिवलग भेटेल अशी आशा आहे.मी आता पाहले आहे की,या साऱ्यादिशा ओस पडल्या आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मला तुझी वार्ता कोणीही सांगत नाही त्यामुळे मला तुझी चिंता वाटत आहे.


अभंग क्र.७१४
जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण तें त्याचें त्यासी नाहीं ॥१॥
म्हणऊनि मागें परतलें मन । घालणीचें रान देखोनियां ॥ध्रु.॥
इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठायीं । फोडीतसे डोई अहंकार ॥२॥
तुका म्हणे देवा वासनेच्या आटें । केलीं तळपटें बहुतांचीं ॥३॥

अर्थ

हे सारे लोक प्रपंचाच्या भोवऱ्यात गुंतले आहेत,हरी भजन करावे याचे देखील त्यांना स्मरण नाही.या संसारात मोठे दुख आहे हे ओळखले आहे म्हणून या संसाररूपी वनातून माझे मन बाहेर काढले आहे ते पुन्हा या संसारात पडणार नाही.या प्रपंचात इंद्रीयांपासून सुख मिळते हा गोंधळ आहे.अहंकार हा सर्वांचे डोके फोड करत आहे.तुकाराम महाराज म्हणतात वासंनाच्यामुळे बऱ्याच जणांचा नाश झाला आहे.


अभंग क्र.७१५
धांवे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥१॥
घ्यावें भरूनियां घर । मग नाहीं येरझार ॥ध्रु.॥
धणी उभें केलें । पुंडलिकें या उगलें ॥२॥
तुका म्हणे ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥३॥

अर्थ

सर्व द्वैत जाणून जो हरी कडे धाव घेतो तोच मोक्षाचा अधिकारी.आपल्या अंतःकरणरुपी घर देवाच्या प्रेमाने परिपूर्ण भरावे,म्हणजे जन्म मरणाची चिंता येर झाराची चिंताच राहणार नाही. प्रेमानेच जगाच्या मालकाला पुंडलीकाने याठिकाणी विटेवर उभे केले आहे.तुकाराम महाराज म्हणतात असा उमटला आहे कि तो संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.


अभंग क्र.७१६
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥ध्रु.॥
ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥२॥
तुका म्हणे जाण । व्हावें लहनाहुनि लहान ॥३॥

अर्थ

हे देवा तू मला लहान पण म्हणजे मला उच्च पद किंवा मोठेपणा ते काही देऊ नकोस.मुंगी लहान असल्यामुळे तिला साखर खायला मिळते.क्षीरसागरात निघालेला ऐरावत हा हत्ती एक थोर रत्न आहे पण त्याला देखिल अंकुशाचा मार खावा लागतो.ज्याचा अंगात मोठेपण आहे त्यांना यातना हि तेवढ्याच मोठ्या असतात.तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व जाणून घेऊन आपण लहानाहुनही लहान व्हावे.


अभंग क्र.७१७
नीचपण बरवें देवा । न चले कोणाचाही दावा ॥१॥
महा पुरें झाडें जाती । तेथें लव्हाळे राहाती ॥ध्रु.॥
येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरी ॥२॥
तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥३॥

अर्थ

नीचपण म्हणजे सामान्यपण हेच बरे आहे देवा,कारण त्याच्या कडे कोणीही महत्वाने पाहत नाही किंवा त्याच्या कडे कोणी हि अपेक्षा करत नाही या कारणाने त्याचा कोणाला रागी येत नाही व त्याचे कोणी वैरही धरीत नाही.महापूर जरी आला तर त्या महापुरात मोठ मोठे झाड वाहून जातात,पण अतिशय लहान असलेले लव्हाळे तसेच राहतात कारण ते पाण्यासमोर वाकतात.समुद्रात पोहताना मोठी लाट आल्यावर जो नम्र होतो म्हणजे खाली वाकतो,त्याच्या पाठीवरून लाट जाते व त्याचे रक्षण होते.तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या बलवान व्यक्तीचे पाय जर धरले तरत्यापुढे ते बलवान व्यक्तीचे आपल्यावर मात्र काही चालत नाही.


अभंग क्र.७१८
उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥
ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥
तुका म्हणे एका नारायणा घ्याई । वरकडा वाहीं शोक असे ॥३॥

अर्थ

एखाद्याच्या कवितेतील चोरून शब्द गोळा करून ते सादर करून त्याचे अलंकार गोळा करून आपले कव्य आहे असे काही कवी करतात व आपला मोठेपणा सिध्द करण्याचा प्रयत्न करतात.असे हे पातकी कवी जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत नरकात खितपत पडतात.तुकाराम महाराज म्हणतात एका नारायणाचे ध्यान करावे,इतर मार्गाला जर आपण लागलो तर शोक करावा लागेल हे खरे.


अभंग क्र.७१९
आवडीच्या मतें करिती भोजना । भोग नारायणा म्हणती केला ॥१॥
अवघा देव म्हणे वेगळें तें काई । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥ध्रु.॥
लाजे कमंडलु धरितां भोपळा । आणीक थिगळा प्रावरणासी ॥२॥
शाला गडवे धातुद्रव्यइच्छा चित्तीं । नैश्वर्य बोलती अवघें मुखें ॥३॥
तुका म्हणें त्यास देवा नाहीं भेटी । ऐसे कल्पकोटि जन्म घेतां ॥४॥

अर्थ

ढोंगी जे साधू असतात ते त्यांच्या आवडीचे इतरांना भोजन करायला लावतात आणि म्हणतात कि, भोजनाचा भोग नारायणाने केला आहे म्हणजे नारायणानेच भोजन सेवन केले आहे.सर्वत्र हरीच आहे असे सांगून थोड्याश्या पैशासाठी एकमेकांचे डोके फोडायला पाहतात.आम्ही साधू आहोत असे सांगणारे लोक हातात कमंडलू अथवा भोपळा धरायला व थिगळ असलेले वस्त्र पांघरण्यास लाजतात.हे सर्व जग मिथ्या आहे असे वर तोंड करून हे ढोंगी लोक सांगतात,मात्र हेच लोक भरजरी कपडे,चांदीचे गडवे आणि धनाची अपेक्षा करतात.तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारच्या ढोंगी साधूंनी कोट्यावधी जन्म जरी घेतले तरी त्यांना भगवंत प्राप्ती होत नाही.


अभंग क्र.७२०
म्हणवितां हरीदास कां रे नाहीं लाज । दीनासी महाराज म्हणसी हीना ॥१॥
काय ऐसें पोट न भरेसे जाले । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥
तुका म्हणे पोटें केली विटंबना । दीन जाला जना कींव भाकी ॥३॥

अर्थ

हे ढोंगी माणसा तू स्वतःला हरिदास म्हणवितोस संसारा ने दिन असलेल्या लोकांकडून स्वतःला महाराज म्हणवितोस असे करताना तुला लाज नाही का वाटत?त्यांच्या पद्धतीने नाचतोस.तुझे पोट भारत नाही,म्हणून तू हे करतोस काय?तुकाराम महाराज म्हणतात पोट भरण्यासाठी याने स्वतःची विटंबना करून घेतली आहे दिन होऊन तु लोकांना भिक मागत आहे.


अभंग क्र.७२१
रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥
लोडे बालिस्तें पलंग सुपत्ति । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥
पुसाल तरि आम्हां वैकुंठींचा वास । परि नाहीं राह्यास ठाव कोठें ॥२॥
तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥३॥

अर्थ

आमच्या घरी समोर रिद्धी सिद्धी दासी आहेत,काय पाहिजे ते द्यायला कामधेनु आहे,पण आमच्या मनात कसलीही अपेक्षा आसक्ती नसल्यामुळे आम्हाला धड भाकरी देखील खायला मिळत नाही.आमच्या कडे लोड,तक्के,गाड्या,पलंग व सर्व सुखसोई आहेत,पण आम्ही इच्छा रहितआहोत त्यामुळे नेसायला वस्त्र देखील नाही.आम्हाला विचारले की,आम्ही कोठे आहोत तर आमचा निवास वैकुंठात आहे परंतु,आम्हाला राहावयास कोठेही जागा नाही.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जगाचे या त्रैलोक्याचे राजे आहोत पण आम्हाला कोणाचेही उणे दुने नाही.


अभंग क्र.७२२
घरोघरीं अवघें जालें ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥
निरें कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु.॥
आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥२॥
काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥३॥
निंदा अहंकार द्वेष बहु फार । माजी वरी धूर सारियला ॥४॥
तुका म्हणे तेथें कांहीं हातां नये । आयुष्य मोलें जाये वांयांविण ॥५॥

अर्थ

घरोघरी सगळे ब्रम्हज्ञानी झालेले आहेत,परंतु त्यांच्यात दोषच दोष असतात.जर खरेच कोणाकडे ब्रम्हज्ञान असेल तर मला दुर्बळाला त्या मधील कण भर तरी द्या हो. अहो लोकांच्या मनामध्ये आशा,तृष्णा,माया यांचे मिश्रण झालेले असून त्याच्यातला दंभ लांबूनच दिसतो आहे.त्यांच्या आता मध्ये काम,क्रोध व लोभ हा भरलेला असून हे काळाकुट विष फारच त्रास दायक आहे.अहंकार,परनिंदा व द्वेष या काजळाने त्यांचे जीवन धुरकटलेले आहे.तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारच्या ज्ञानाने हाती काहीच लागणार नाहीच परंतु,उलट अमोल असे मानवी जीवन हे वयाला जाते.


अभंग क्र.७२३
अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघीच दान दिली भूमि ॥१॥
अवघाचि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥ध्रु.॥
अवघींच तीर्थे व्रतें केले याग । अवघेंचि सांग जालें कर्म ॥२॥
अवघेचि फळ आलें आम्हां हातां । अवघेचि अनंता समर्पीलें ॥३॥
तुका म्हणे आतां बोलों अबोलणें । काया वाचा मनें उरलों नाहीं ॥४॥

अर्थ

आम्ही सर्व भूत मात्रांना अन्नाचे दान दिले आहे सर्व पृथ्वी आम्ही दान दिली आहे.सगळे दिवस व रात्र शुध्द स्वरूपाचे केला,त्याला पर्वकाळाचे स्वरूप दिले.आम्ही सर्व कर्म केले सर्व प्रकारची यथासांग कर्मे संपविले.या सर्व कर्माचे फळ आमच्या हातात आले पण आम्ही तेही फळ या हरीला समर्पण केले.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कितीही ब्रम्‍ह ज्ञानाविषयी बोललो तरी ते ब्रम्‍हज्ञान आहे बोलण्याचाही पलीकडचे आहे आता काय,वाचा,मानाने आम्ही उरलोच नाही.


अभंग क्र.७२४
महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥१॥
पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तो ॥ध्रु.॥
विरळा पावे विरळा पावे । अवघड गोवे सेवटीचे ॥२॥
उंच निंच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥३॥
झळके तेथें पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥४॥
पावेल तो पैल थडी । म्हणों गडी आपुला ॥५॥
तुका म्हणे उभाऱ्यानें । खरें कोण मानितसे ॥६॥

अर्थ

जेवढा आंब्याच्या झाडला मोहोर येतो तेवढी फळे येत नाही आणि जेवढी फळे येतात त्यातलीही काही गळून जातात.आढी तयार केल्यानंतर त्यातली काही फळे नासतात व थोडीच फळे पक्के होतात पिकतात.त्याच प्रमाणे परमार्थाच्या मार्गावरून चालणारे फार आहेत पण त्यातील काही च लोक हरीशी एकरूप होतात.अनेक प्रकारचे उच्च नीच लोक हे देवाच्या परिवारात आहे परंतु ज्या प्रमाणे धन्याला चाकराची माहिती असते त्या प्रमाणे ह्या धन्याला(देवाला)या चाकराची(आपली)माहिती असते कोण कशी सेवा करतो या कडे त्याचे पूर्ण लक्ष असते.जो खऱ्या भावार्थाने सेवा करतो त्यालाच यांची प्राप्ती होते त्याची कृपा होते.असे थोडेच लोक असतात कि त्यांना देवाची प्राप्ती होते.अश्या या शुध्द भक्तीने जो भवसागरातून पार होतो तोच आमचा खरा मित्र होय.तुकाराम महाराज म्हणतात नाही तर फक्त भक्तीचा डामडौल करणाऱ्याला त्याच्या भक्तीला कोण मानेल?


अभंग क्र.७२५
अवघ्या उपचारा । एक मनचि दातारा ॥१॥
घ्यावी घ्यावी माझी सेवा । दिन दुर्बळाची देवा ॥ध्रु.॥
अवघियाचा ठाव । पायांवरी जीवभाव ॥२॥
चित्ताचें आसन । तुका करितो कीर्तन ॥३॥

अर्थ

परमार्थात हरी प्राप्ती करून घेण्यासाठी सर्व श्रेष्ठ साधन म्हणजे मन होय हे दातार मी तुला माझे हे मन अर्पण केले आहे.माझी सेवा दिन दुर्बळाची आहे ती तू गोड मानून घे.तुला सर्व काही माहित आहे तू सर्व जाणता आहे,हे हरी मी तुझ्या पायावर माझा जीवभाव अर्पण केला आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या चित्ताचे आसन करून मी तुझे गुणगान गात आहे तुझे कीर्तन करतो आहे.


अभंग क्र.७२६
आळी सलगी पायांपाशीं । होईल तैसी करीन ॥१॥
आणीक आह्मीं कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥
अवघ्या निरोपणा भाव । हाचि ठाव उरलासे ॥२॥
तुका म्हणे पाळीं लळे। कृपाळुवे विठ्ठले ॥३॥

अर्थ

हरी तुझ्या चरणांपाशी आम्ही आवडेल तसे हट्ट आम्ही पूर्ण करून घेऊ.तुला सोडून आम्ही दुसरे कोठे बरे जावे?तुझ्या चरणांमध्ये आमचा जीव गुंतला आहे.आमचा भाव निरुपण करण्यास तुझेच एक स्थान उरले आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तू कृपाळू आहेस तूच आमचे लाड पूर्ण करावेत.


अभंग क्र.७२७
देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं श्वानशूकरें ॥१॥
येणें नांवें जाला मी माझ्याचा झाडा । मोह नांवें खोडा गर्भवास ॥ध्रु.॥
गृह आणि वित्त स्वदेहा विटावें । इतरा भेटावें श्वापदाझाडां ॥२॥
तुका म्हणे मी हें माझें न यो वाचे । येणें नांवें साचे साधुजन ॥३॥

अर्थ

देह आणि देह संबंधीचे जे कोणी आहेत त्या सर्वांची निंदा करावी व सर्व प्राणी मात्रांना वंदन करावे.यामुळे “मी व माझे” या भ्रमाचा नाश नक्की होईलच.देह मी आहे असे जो समजतो तो,गर्भवासाच्या चक्रात गुंतून पडतो.घर,धन,जागा,स्वतःला विसरावे व इतर प्राणीमात्र व निसर्गाशी संबंध जोडावा.तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या कुणाच्या मुखातून “मी आणि माझे” असे शब्द येत नाही त्याचेच नाव साधू आहे असे मानावे.


अभंग क्र.७२८
देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं कलेवर ओंवाळूनि ॥१॥
नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥
करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥२॥
तुका म्हणे सांडीं लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥३॥

अर्थ

देवाच्या माथ्यावर सर्व भार घालून त्यावरून आपला जीव ओवाळून टाकावा.देहाभिमानाचा छंद नाद हा खोटा आहे,तो तू दूर कर.एकसारखे तू हरी नामाचा टाहो कर दुसरे काही आडे येऊ देवू नकोस.तुकाराम महाराज म्हणतात अरे तू या लटिक्या(खोट्या)चा संग टाकून दे मग आंनद कसा प्रकट होतो ते बघ.


अभंग क्र.७२९
देह नव्हे मी सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥
म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ध्रु.॥
पाळणाची नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥२॥
तुका म्हणे जीवासाठी । देव पोटीं पडेल ॥३॥

अर्थ

जेव्हा मी ब्रम्ह आहे हे समजते तेंव्हा जीव विठ्ठल रूप होतो.म्हणून त्वरा करून त्याच्याच चिंतनात वेळ घालवावा.देव सर्व ठिकाणी आहे म्हणून आपल्या पाळनाची म्हणजे पालनाची चिंता नाही.तुकाराम महाराज म्हणतात आपण जर देवाला आपला जीवच अर्पण केला तर तो परमात्माच आपल्या हृदयात प्रकट होईल.


अभंग क्र.७३०
पृथक मी सांगों किती । धर्म नीती सकळां ॥१॥
अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥
क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥२॥
तुका म्हणे आगमींचें । मथिलें साचें नवनीत ॥३॥

अर्थ

मी सर्वांना धर्म आणि नीती बद्दल किती वेळा सांगू?विठ्ठलाच्या ठिकाणी सर्वांनी शुध्द भाव ठेवणे हेच धर्म आणि नीती आहे. क्षर आणि अक्षराचा भाग एक विठ्ठल आहे व तोच पंढरपूरलाच आहे,सर्वांनी तेथे जावे.तुकाराम महाराज म्हणतात सर्व मंथन केलेले वेदाचे सारभूत लोणी म्हणजे एक विठ्ठलच आहे.


अभंग क्र.७३१
पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥१॥
आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावें तें नाभी करवी दंड ॥ध्रु.॥
नागवला अल्प लोभाचिये साठी । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥२॥
तुका म्हणे हात झाडिले परत्रीं । श्रम तोचि श्रोत्रीं ठेवी केली ॥३॥

अर्थ

हरी ची कथा गायत्री मंत्र इत्यादी पुण्यकर्म ची विक्री करणे म्हणजे प्रत्यक्ष मातेशी गमन केल्यासारखेच आहे आणि हे पुण्यकर्म करून मिळालेले धन म्हणजे भाड्याचे धन घेणे म्हणजे मातेचा विटाळच हातात घेण्यासारखे कर्म आहे.विषयांचा लोभ असणारा मनुष्य हा आत्महत्यारा आहे अशा मनुष्यास दंड करण्यास भिऊ नये त्याला निसंकोचपणे दंड करावा, त्याला(विषय लोभी) दंड करणाऱ्या व्यक्तीस तू “घेऊ नकोस खुशाल दंड कर” असे म्हणावे.विषय लोभी मनुष्य हरी कथेची विक्री करतात पुण्यकर्म ची विक्री करून ते परीस देऊन काचेचा तुकडा घेतल्यासारखे करतात आणि परमार्थातील मोठा लक्ष्मी द्रव्यरूप ठेवा घेण्यास ते मुकतात.तुकाराम महाराज म्हणतात या लोभीवेद संपन्न मनुष्यांनी यज्ञयाग इत्यादी कर्म करून पुण्याचा साठा केलेला असतो त्यानिमित्ताने त्यांना स्वर्गप्राप्ती तर होते परंतु त्यांच्या पुण्याचा साठा संपला की ते पुन्हा आपले हात झाडून नागवे होतात म्हणजे शेवटी त्यांच्या हातात केवळ करत श्रमच उरतो.


अभंग क्र.७३२
अंतरींचें ध्यान । मुख्य नांव या पूजन ॥१॥
उपाधि तें अवघें पाप । गोड निरसतां संकल्प ॥ध्रु.॥
आज्ञा पाळावी हा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥२॥
तुका म्हणे वृत्ति । अविट हे सहज स्थिति ॥३॥

अर्थ

हरीचिंतन अंतःकरणामध्ये करणे यालाच मुख्य पूजन असे म्हणतात.इतर उपाधी हे पाप आहे त्यामुळे त्याचा संकल्प नष्ट करणे हेच बरोबर आहे.भगवंताची आज्ञा पालन करणे हाच धर्म आहे,हे तुम्ही सर्व जाणते मंडळीनी जाणून घ्या हो.तुकाराम महाराज म्हणतात सहज स्थितीत राहिल्या मुळे या स्थितीचा कधीच वीट येत नाही.


अभंग क्र.७३३
मूळ करण सत्ता । नाहीं मिळत उचिता ॥१॥
घडे कासयानें सेवा । सांग ब्रम्हांडाच्या जीवा ॥ध्रु.॥
सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी ॥२॥
तुका म्हणे भावें । शरण म्हणवितां बरवें ॥३॥

अर्थ

सर्व जगताचे मूळ स्वरूप म्हणजे निर्गुण स्थिती आहे तेथे देवा तुझी योग्य सेवा करण्यास मिळत नाही.तुझी सेवा कशी घडेल तेवढे हे ब्रम्हांडनायका तू मला सांग?सागरामध्ये दुसरा सागर समावत नसतो तसे आपणही ब्रम्हरूप झाल्यावर कशी सेवा होईल तेवढे तू सांग?हे हरी आम्ही द्वैत ठेऊन च तुला शरण आलो आहे हेच म्हणणे बरे वाटते.


अभंग क्र.७३४
बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी ॥१॥
जालें आम्हांसी जीवन । धणीवरी हें सेवन ॥ध्रु.॥
सोपें आणि गोड । किती अमृताही वाढ ॥२॥
तुका म्हणे अच्युता । आमुचा कल्पतरु दाता ॥३॥

अर्थ

हे देवा तुझी नामवळी बरवी आहे म्हणजे बरी आहे कारण ती सर्व महादोषाची होळी करते.आम्ही जो पर्यंत आहोत तो पर्यंत आम्ही ती नामावळी सेवन कारणार आहोत कारण ते आमचे जीवनच झाले आहे.ती अतिशय सोपी व अमृता पेक्षाही गोड आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे केशवा हे,अच्चुता कल्पतरू प्रमाणे तू आमचा दाता आहे.


अभंग क्र.७३५
तृषाकाळी उदक भेटी । पडे मिठी आवडीची ॥१॥
ऐसियाचा बरवा संग । जिवलग संतांचा ॥ध्रु.॥
मिष्टान्नाचा योग भुके । म्हणतां चुके पुरेसें ॥२॥
तुका म्हणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥३॥

अर्थ

तृषा(तहान)लागल्यावर पाणी मिळाल्यावर जो तृप्तीचा आंनद आहे तोच आंनद मला संतांची भेट झाल्यावर घडो.ज्या प्रमाणे भुकेच्या वेळी पक्वान्नाचा लाभ होऊन बस म्हणे पर्यंत भोजन मिळते तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणेच आई आणि बळाच्या भेटीचा कळवळा असतो.


अभंग क्र.७३६
कुचराचे श्रवण । गुणदोषांवरी मन ॥१॥
असोनियां नसे कथे । मूर्ख अभागी तें तेथें ॥ध्रु.॥
निरर्थक कारणीं । कान डोळे वेची वाणी ॥२॥
पापाचे सांगाती । तोंडीं ओढाळांचे माती ॥३॥
हिताचिया नांवें । वोस पडिले देहभावें ॥४॥
फजीत करूनि सोडीं । तुका करी बोडाबोडी ॥५॥

अर्थ

कुच्चर श्रोते वक्त्यांच्या दोषां कडेच पाहतात.कथा चालू असतना देखील असे मूर्ख श्रोते तेथे असले तरी तेथे नसल्यासारखे समजावे.ते आपले कान,डोळे आणि वाणी निष्कारण दुसरीकडे खर्च करतात.अश्या मूर्ख व ओढाळ लोकांच्या पापांमुळे त्यांच्या तोंडात मातीच पडते.हिताच्या नावाने त्यांचे देह हे ओस पडले आहे.तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांची आम्ही फजिती करून हजामत करतो.


अभंग क्र.७३७
जग तरि आम्हां देव । परि हे निंदितों स्वभाव ॥१॥
येतो हिताचा कळवळा । पडती हातीं म्हणूनी काळा ॥ध्रु.॥
नाहीं कोणी सखा । आम्हां निपराघ पारिखा ॥२॥
उपक्रमें वदे । तुका वर्मासी तें भेदे ॥३॥

अर्थ

जग हे सर्व देवा प्रमाणेच आहे परंतु जे वाईट स्वभावाचे लोक आहेत त्यांची आम्ही निंदाच करतो.पण ते काळाच्या तोंडात पडणार हे पाहून आम्हाला त्यांच्या हिताचा कळवळा येतो.आमचा कोणीही सखा मित्र नाही आणि कोणीही परका नाही.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अगदी स्पष्ट बोलतो पण ज्यांच्या अंगी दोष आहेत त्यांना आमचे बोलणे वर्मी लागते.


अभंग क्र.७३८
सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा ॥१॥
समाधीचें सुख सांडा ओंवाळून । ऐसा या कीर्तनी ब्रम्हरस ॥ध्रु.॥
पुढती घडे चढतें सेवन आगळें । भक्ती भाग्य बळें निर्भरता ॥२॥
उपजोंचि नये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरीदासांच्या ॥३॥
तुका म्हणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणें ॥४॥

अर्थ

हरी प्राप्ती चे अगदी सोपे वर्म आम्हाला संतानी सांगिले आहे,हाती टाळ,मुखाने हरीचे नाव व विणा हेच ते साधन आहे.कीर्तनामध्ये असे ब्रम्हरस आहे कि त्या वरून समाधी सुख ओवाळून टाकावी.या भक्ती प्रेमाच्या सेवनाने पुढे तर अगदी आनंद व निर्भयता प्राप्त होते.या भक्तीच्या आनंदाने तर चित्तात कुठल्याही प्रकारचा संदेह राहत नाही.उलट चारी मुक्ती हे हरिदासांच्या होऊन जातात.तुकाराम महाराज म्हणतात मनाला शांती लाभून त्रिविध ताप क्षणात नाहीसे होतात.


अभंग क्र.७३९
गंगा न देखे विटाळ । तेंचि रांजणींही जळ ॥१॥
अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु.॥
काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिकां लोकां ॥२॥
तुका म्हणे आगीविण । बीज वेगळे तों भिन्न ॥३॥

अर्थ

गंगेच्या प्रवाहातील पाण्याला विटाळ नसतो,परंतु तेच पाणी एखाद्या भांड्यात भरून ठेवले तर ओवळ्याच्या(अशुध्द) स्पर्शाने त्याला विटाळते.पदार्थ हा लहान असला किंवा मोठा असला तरी तो सारखा नसतो कारण त्याला थोडे बाजूला केले तर ते दुषित होऊ शकते.पृथ्वी वर अनेक प्रकारचे लोक राहतात पृथ्वीला पायरी मानून तिच्यावर चालतात,पण ती कधी भेद करत नाही पण त्याच पृथ्वीवर अनेक लोक एकत्र आले तर ते एकमेकांमध्ये जातीभेद करतात. तुकाराम महाराज म्हणतात बीज हे अग्नी पासून भिन्न असते त्यावेळी त्यामध्ये दोष पाहिला जातो,परंतु ते अग्नी रूप झाले कि त्याच दोष जातो.


अभंग क्र.७४०
देवावरील भार । काढूं नये कांहीं पर ॥१॥
तहानभुके आठवण । घडे तें बरें चिंतन ॥ध्रु.॥
देखावी निंश्चिती । तोचि अंतर श्रीपती ॥२॥
वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥३॥

अर्थ

देवाच्या चरणांवर जो आपण भार टाकला आहे तो कधी काढू नये,ज्यावेळी तहान भूक लागते त्यावेळी त्याचे चिंतन होते हे चांगले आहे.त्याचे चिंतन केले नाही मग तर तो आपल्या पासून दुरावतो.तुकाराम महाराज म्हणतात देवा समोर मी हे संसारीक वैभव त्याज्य मानतो.


अभंग क्र.७४१
थुंकोनियां मान । दंभ करितों कीर्तन ॥१॥
जालों उदासीन देहीं । एकाविण चाड नाहीं ॥ध्रु.॥
अर्थ अनर्था सारिखा । करूनि ठेविला पारिखा ॥२॥
उपाधि वेगळा । तुका राहिला सोंवळा ॥३॥

अर्थ

मान,सन्मान या गोष्टींचा त्याग करून मी कीर्तनात दंगून जात आहे.देहा विषयी मी उदासीन झालो आहे,एका देवावाचून मला दुसरी आवड नाही.अर्थ म्हणजे पैसा, धन तो अनर्थ आहे म्हणून मी त्याला वेगळा ठेवला आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व प्रकाच्या उपाधी पासून वेगळा सोवळा(शुद्ध) अलिप्त राहिलो आहे.


अभंग क्र.७४२
काय ह्याचें घ्यावें । नित्य नित्य कोणें गावें ॥१॥
केलें हरीकथेनें वांज । अंतरोनी जाते निज ॥ध्रु.॥
काम संसार । अंतरीं हे करकर ॥२॥
तुका म्हणे हेंड । ऐसे मानिती ते लंड ॥३॥

अर्थ

कितीतरी असे लोक आहेत कि ते म्हणतात की,या देवाचे रोज रोज काय नाव घ्यावे?त्याचे गुणगान रोजच काय वर्णन करावे?हि हरिकथा व्यर्थ आहे या हरी कथेने आमची झोप दुरावते.या हरी कथेची सवय झाली तर संसारातील काम धंदा सुचत नाही,सुखोप भोग घेता येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात हरी कथेला असे म्हणारे लोक केवळ दोषी पाखंडी नालायक आहेत.


अभंग क्र.७४३
वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मिश्रित ॥१॥
न लगे कांहीं चाचपावें । जातां भावें पेरीत ॥ध्रु.॥
भांडार त्या दातियाचें । मी कैचें ये ठायीं ॥२॥
सादावीत जातो तुका । येथें एकाएकीं तो ॥३॥

अर्थ

माझी वाणी हि नारायण मिश्रित झाली आहे हे मी साक्षित्वाने बोलतो.आता मला इतर कुठेही काही चाचपडत बसण्याची गरज नाही,कारण मी भक्ती भावाने उपदेशाची पेरणी करत आहे.माझे जे काही उपदेश आहेत ते सर्व भांडार हे त्या दात्याचे आहे,मी कोण तो बोलणारा?तुकाराम महाराज म्हणतात मी एकटा जरी असलो तरी सगळ्यांना परमार्थ रुपी उपदेश करत सावध करत आहे.


अभंग क्र.७४४
ऐसी जिव्हा निकी । विठ्ठल विठ्ठल कां न घोकी ॥१॥
जेणें पाविजे उद्धार । तेथें राखावें अंतर ॥ध्रु.॥
गुंफोनि चावटी । तेथें कोणा लाभें भेटी ॥२॥
तुका म्हणे काळ । देवाविण अमंगळ ॥३॥

अर्थ

अहो तुमची जीभ एवढी चांगले आहे तरी देखील त्या जिभेचे द्वारे तुम्ही विठ्ठल विठ्ठल असा नामोच्चार का करत नाही.ज्या विठ्ठल नाम द्वारे तुमचा उद्धार होणार आहे त्याच्यापासून तुम्ही अंतर ठेवू नका सारखे विठ्ठलाचे चिंतन तुम्ही चित्तामध्ये चालू ठेवा.अहो केवळ बोलण्यात चावट शब्द वापरल्याने काय लाभ होणार आहे.तुकाराम महाराज म्हणतात अहो तुम्ही सतत देवाचे नामस्मरण करत रहा असे जर तुम्ही केले नाही तर जो काळी तुम्ही देवाचे नामोच्चार करणार नाही तो काळ मंगळ असेल देवाच्या नामस्मरणा वाचुन वाया गेलेला वेळ म्हणजे अमंगळ आहे.


अभंग क्र.७४५
साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार ॥१॥
व्यभिचारीचा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥ध्रु.॥
शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणीं ॥२॥
तुका म्हणे जिणें । शर्त्ती विण लाजिरवाणें ॥३॥

अर्थ

जर पती त्याच्या पत्नीचा उपभोग घेत असेल तर,त्या स्त्रीचे दागिने शोभून दिसतो.परंतु तोच दागिना एखाद्या व्यभिचारिण स्त्रीने परिधान केला तर तिचा उपहास होतो.ज्याचे वागणे हि शूरत्वाचे आणि बोलणे हि शूरत्वाचे असते तो दिसतोही शूर आणि असतोही शूर.तुकाराम महाराज म्हणतात निर्धारावाचून(हरी भक्तीचा निर्धारा वाचुन) जगणे हे लाजिरवाणे जिणे आहे.


अभंग क्र.७४६
मानामान किती । तुझ्या क्षुल्लक संपत्ती ॥१॥
जा रे चाळवीं बापुडीं । कोणी धरितील तीं गोडी ॥ध्रु.॥
रिद्धीसिद्धी देसी । आह्मीं चुंभळें नव्हों तैसीं ॥२॥
तुका म्हणे ठका । ऐसें नागविलें लोकां ॥३॥

अर्थ

हे देवा मान आणि अपमान या तुझ्या किती शुल्लक संपत्ती आहेत?ज्या लोकांना याची गोडी आहे त्या वेड्यांना ती तू देत जा.तू आम्हांला रिद्धी सिद्धी देशील पण आम्ही तसे लोभी नाहीत.तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा असे मान आणि अपमानाची संपत्ती देऊन तू किती लोकांना फसविले आहेस.


अभंग क्र.७४७
पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥
वरी ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥ध्रु.॥
बरवें करीं सम । नको भंगों देऊं प्रेम ॥२॥
तुका म्हणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥३॥

अर्थ

हे देवा तू काय पाहतोस तुझे चरणकमल पुढे कर.मी हात जोडून उभा आहे,तुझ्या चरणावर मला माझे मस्तक ठेऊ दे.तुझे दोन्ही पाय जोडून उभा राहा माझे प्रेम भंगू देऊ नकोस.तुकाराम महाराज म्हणतात आता चला देवा विठ्ठला मी तुमच्या अगदी समोर उभा आहे मला पाया पडू द्या.


अभंग क्र.७४८
भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१॥
विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे जन धन माता पिता ॥ध्रु.॥
निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहींच सांकडें पडों नेदी ॥२॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य । घातलिया भय नर्का जाणें ॥३॥

अर्थ

जे देहा विषयी उदास आहेत तेच भक्त जाणावे.त्यांचि आशापाश निवारण झालेले आहे.त्यांचा विषय म्हणजे फक्त नारायण झालेला असतो.त्यांना या संसारातील जन,धन,सगे काहीच आवडत नाहि,अश्या भक्तांच्या मागे पुढे देंव त्यांचे सर्व कष्ट निवारण करण्या साठी उभा असतो.यांना तो कधी संकटात सापडू देत नाही.तुकाराम महाराज म्हणतात सत्य काम जे असेल त्याला सहकार्य करावे नाही तर जो कोणी सत्य कर्मात अडथळा आणतो त्याला नरकात जावे लागते.


अभंग क्र.७४९
तोंचि हीं क्षुल्लकें सखीं सहोदरें । नाहीं विश्वंभरें वोळखी तों ॥१॥
नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रमाण तो होतां सकळ मिथ्या ॥ध्रु.॥
रवि नुगवे तों दीपिकाचें काज । प्रकाशें तें तेज सहज लोपे ॥२॥
तुका म्हणे देहसंबंधे संचितें । कारण निरुतें नारायणीं ॥३॥

अर्थ

विश्वंभरची ओळख आपल्याला तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत आपण संसारातील सगळे नाते सगे सोयरे जन धन याला विसरत नाही, तो पर्यंत त्याचा अनुभव आपल्याला येत नाही.आपण त्याला ओळखू शकत नाहि.जेंव्हा आपल्याला समजते किंव्हा अनुभव येतो की,नारायणच या विश्वाचे पालन पोषण करतो,तेंव्हा जग हे मिथ्या वाटू लागते.सूर्य उगवत नाही तो पर्यंत दीपकाचे काम असते,व नंतर सूर्य उगवला कि त्या दीपकाचे काम संपते.तुकाराम महाराज म्हणतात हा देह आपल्याला संचीताने प्राप्त झालेला असतो,त्यामुळे याच उपयोग हा नारायणाच्या मिळण्यासाठी करावा.


अभंग क्र.७५०
यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कार्य कारणा । पावावया उपासना । ब्रम्हस्थानीं प्रस्थान ॥१॥
एक परी पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तोचि जगीं । आदि अंत सांभाळी ॥ध्रु.॥
आवश्यक तो शेवट । येर अवघी खटपट । चालों जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ॥२॥
तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरावेगळा । पाहे निगमकळा । बोले विठ्ठलप्रसादें ॥३॥

अर्थ

यज्ञाने पाउस पडतो,त्यामुळे सर्व प्राणी मात्रांचे पालन पोषण होते हे कार्य कारणाचा संबंध असला तरी हरीची उपासना केली पाहिजे व जीवाने ब्रम्ह स्थिती प्राप्त केली पाहिजे.ईश्वर स्वरूपाचे बीज हे वेगवेगळ्या ठिकाणी वाटले गेले आहे,ते फळ अव्यक्त स्वरूपाचे असते.या फळाच्या व बीजाच्या आदी व अंती जो परमेश्वर आहे त्याचे अनंत रूप आहे तोच सांभाळ करणारा आहे व जो हरीची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करतो तो जगामध्ये धन्य आहे.हा श्रीहरी प्राप्त करून घेणे महत्वाचे आहे इतर खटपट हि व्यर्थ आहे त्या हरीशी एक्य पावणारा क्वचितच एखादा असतो.तुकाराम महाराज म्हणतात मी क्षर आणि अक्षर याहून वेगळा झालो आहे,विठ्ठलाच्या कृपाप्रसादानेच मी तुम्हाला उपदेश करत आहे.


अभंग क्र.७५१
वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥१॥
तुझीं वर्में तूचि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ध्रु.॥
यज्ञाचा भोक्ता तरि कां नव्हे सांग । उणें पडतां अंग क्षोभ घडे ॥२॥
वससील तूं या भूतांचे अंतरीं । तरि कां भेद हरी दावियेला ॥३॥
तपतिर्थाटणें तुझी मूर्तीदान । तरि कां अभिमान आड येतो ॥४॥
आतां क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनियां हाका उभा द्वारीं ॥५॥

अर्थ

हे देवा तुम्ही तर साक्षात वेद रूप आहात तरी हि तुम्हाला “नेती नेती” या शब्दाने जगापेक्षा वेगळे का बरे केले?हे अनंता तुझे जे काही वर्म आहेत ते तूच दाखविले आहे,मग हे वर्म दाखवून तू कोणत्या गुणांमुळे नेणता होतोस?तू तर यज्ञाचा भोक्ता आहेस,मग तो यज्ञ का पूर्ण होत नाहि?त्यात काही उणे असल्यावर क्षोभ का होतो?हे देवा तू सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी वसतोस मग हा भेद का निर्माण केलास?तप करणे,तीर्थाटन करणे,दान करणे हे जर सर्व तुझीच मूर्ती आहेत मग हे सर्व करणारे लोकांच्या मानत अभिमान का निर्माण होतो?तुकाराम महाराज म्हणतात आता मला क्षमा करावी देवा कारण हि सर्व गाऱ्हाणी मी तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्या दारात उभा राहून मी तुम्हाला विनंती करत आहे व हाक मारत आहे.


अभंग क्र.७५२
जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥१॥
पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ध्रु.॥
फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥२॥
घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें काहीं न चले येथें ॥३॥
तुका म्हणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥४॥

अर्थ

हे केशवा माझ्या शरीराला वानवा लागला आहे तू लवकर धावत ये.माझ्या शरीराची कांती व तेज हे जळू लागले आहे,माझ्या शरीराचा दाह होत आहे तो मला सहन होत नाही.अरे पांडुरंगा माझ्या शरीराचे आता फुटून दोन भाग होऊ लागले आहेत,आणि हे केशव तू अजून माझे हृदय काय पाहतोस?तू दाह शांत करण्यासाठी पाणी घेऊन लवकर ये,तुझ्या वाचून येथे कोणाचे काहीच चालणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात तूच माझी जननी आहे मग तुझ्यावाचून कोण माझे रक्षण करणार?


अभंग क्र.७५३
नामदेवें केलें स्वप्नमाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका ॥३॥

अर्थ

संत नामदेव माझ्या स्वप्नात आले,त्यांच्या संगे पांडुरंग येऊन मला त्यांनी जागृत केले.देवाचे वर्णन केलेले कवित्व करावे,उगीच व्यर्थ गोष्टींबद्दल बोलू नको असे सांगितले व त्यांनी मला अभंग तयार करावयास लावले आहे.मी झोपेत होतो निद्रा अवस्थेत असताना संत नामदेव माझ्या स्वप्नात आले व त्यांनी मला थोपटून जागे केले व म्हणाले,तू अभंगाचे माप पुरपूर टाक,असे त्यांनी मला थापटून सावध करून सांगितले.तुकाराम महाराज म्हणतात संत नामदेवांनी मला सांगितले की,”मी शतकोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यापैकी मी शहाण्णव कोटी अभंग केले आहेत उरलेले चार कोटी अभंग तू कर”


अभंग क्र.७५४
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥ध्रु.॥
शेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन ॥२॥
नामदेवापायीं तुकया स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥३॥

अर्थ

ज्या वेळी संत नामदेव महाराज व श्री विठ्ठल माझ्या स्वप्नात येऊन मला अभंग रचना करण्यास त्यांनी आज्ञा केली त्यावेळी मी त्यांना म्हणालो की जर तुम्ही मला तुमच्या पायाजवळ आश्रय दिला तर मी तुमच्या संगतीत राहील संतांच्या पंगतीत मी बसू शकेल मग मला अभंग रचना करण्याचा अधिकार प्राप्त होईल.तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मी माझ्या आवडीचे ठिकाण सोडून तुमच्या कडे आलो आहे.आता तुम्ही माझ्या विषयी उदासीन असू नये.मी शेवटच्या जागी बसतो,माझी वृत्ती नीच आहे,परंतु आता मला तुमच्या आधारे विश्रांती मिळेल.तुकाराम महाराज म्हणतात संत नामदेव यांच्या पायी माझी स्वप्नात भेट झाली आहे.त्यामुळे अभंग कवित्व करण्याच्या स्फुर्तीचा प्रसाद माझ्या पोटी म्हणजे हृदया मध्ये भरून राहिलेला आहे.


अभंग क्र.७५५
अभक्त ब्राम्हण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु.॥
ऐसा हा निवाडा जालासे पुराणीं । नव्हे माझी वाणी पदरींची ॥२॥
तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥३॥

अर्थ

अभक्त ब्राम्हण असेल तर त्याच्या तोंडाला आग लागो,त्याच्या आईने तरी त्याला का जन्म दिला असेल?जर एखादा वैष्णव चांभार असेल तर त्याचि माता शुध्द असून त्याचे संपूर्ण सर्व कुळ शुध्द असते.माणसाचे हृदय हे शुध्द पाहिजे हे मी सांगत नसून त्याचा निवडा हा पुराणतच झालेला आहे.तुकाराम महाराज म्हणतात जे स्वतःला मोठे म्हणतात अश्या या थोरपणाला आग लागो,आणि ते दृष्ट माझ्या समोर कधीही दिसू नये.


अभंग क्र.७५६
त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणां जोगें । एक जातां लागें । एक पाठीं लागतें ॥१॥
मागें पुढें अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ । कृपे खांदां हरी वाहे ॥ध्रु.॥
पापपुण्यात्म्याच्या शक्ती । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती । तेथें सत्तानायका ॥२॥
तुका उभा पैल थडी । तरि हे प्रकार निवडी । घातल्या सांगडी । तापे पेटे हाकारी ॥३॥

अर्थ

त्रिपुटीच्या योगाने हे जग चालते.या चक्रात जो कोणी गुंतला,तर तो एकातून सुटला की दुसऱ्या चक्रात गुंततो.मागे पुढे काळ वाट पाहत आहे,त्यातून पळून जाणे फार अवघड आहे,पण जर अंतःकरणापासून विठ्ठलाचे नाव घेतले,तर तो आपल्यावर कृपा करून आपला भार वाहून नेतो.पाप पुण्याच्या शक्ती या देवानेतर योजल्या आहेत,म्हणून त्याला सर्व काकुळती येऊन सर्वभावे त्या सत्तानायकाला शरण जावे.तुकाराम महाराज म्हणतात मी पहिलेच या भाव सागरातून तरलो आहे,या भवसागरात हे बुडतील म्हणून मी त्यांना तरण्या साठी हरीनामरूपी सांगड,तराफा व पेट्या देऊन लोकांना हाक मारत आहे.


अभंग क्र.७५७
देखण्याच्या तीन जाती । वेठी वार्ता अत्यंतीं ॥१॥
जैसा भाव तैसें फळ । स्वातीतोय एक जळ ॥ध्रु.॥
पाहे सांगे आणि जेवी । अंतर महदंतर तेवी ॥२॥
तुका म्हणे हिरा । पारखियां मूढां गारा ॥३॥

अर्थ

देवाकडे पाहण्याचे तीन प्रकार आहेत,एक म्हणजे इच्छा नसताना दुसऱ्याच्या आग्रहास्तव पाहणे,दुसरा म्हणजे दुसऱ्याने सांगितले म्हणून पाहने आणि तिसरा म्हणजे स्वतः पाहणे.जसा भाव असेल तसेच आपल्याला फळ प्राप्त होते,स्वाती नक्षत्रा चे पाणी हे एक सारखेच असते पण तेच पाणी पहिले तव्यावर टाकले तर त्याची वाफ होते,कमळावर ते मोत्यासारखे भासते,तर शिंपल्यात मोतीच दिसते.अन्न पाहणे,त्याचे वर्णन करने व भोजन करणे यात फरकच असतो.तुकाराम महाराज म्हणतात हिऱ्याची पारख ज्या कोणाला असते ते त्यालाच कळते हिरा ज्यांना माहित नाही तो हिरा त्यांना गारगोटी प्रमाणेच वाटतो.


अभंग क्र.७५८
अनुभवें अनुभव अवघाचि साघिला । तरि स्थिरावला मन ठायीं ॥१॥
पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥ध्रु.॥
एकचि उरलें कायावाचामना । आनंद भुवनामाजी त्रयीं ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥३॥

अर्थ

अनुभवाने( संत संगतीने हे समजले की सर्व भूत मात्रा देवाचे स्वरूप आहे) सर्व अनुभव साधला(सर्व जगात हरिरूप आहे) म्हणून मन एक जागी स्थिरावले.हिणकस सोने मुशीत घालून गरम केले जाते त्यामुळे हिणकस पणा नाहीसा होऊन शुध्द सोनेच उरते.त्याच प्रमाणे आम्हीही तापून निघालो आहे आता फक्त काया,वाचा,मन हेच उरले आहे.आता फक्त आंनद उरला आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या विठोबाचे फक्त दास म्हणून उरलो आहोत म्हणून आम्ही संसार जिंकला आहे.


अभंग क्र.७५९
ऐसिया संपत्ती आम्हां संवसारी । भोगाचिया परि काय सांगों ॥१॥
काम तो कामना भोगीतसे देवा । आलिंगणे हेवा चरण चुंबीं ॥ध्रु.॥
शांतीच्या संयोगें निरसला ताप । दुसरें तें पाप भेदबुद्धी ॥२॥
तुका म्हणे पाहें तिकडे सारिखें । आपुलें पारिखें निरसलें ॥३॥

अर्थ

आम्हाला या संसारात अमाप संपत्ती लाभली आहे ती संपत्ती म्हणजे या विठ्ठलाचे प्रेम आहे,त्याचे आम्ही आंनदाने भोग घेत आहो.याचे वर्णन कसे करावे?आमच्या सर्व कामना इच्छा देवाचे भोग घेत आहेत,त्या विठ्ठला आम्ही आलिंगन देऊन त्याच्या चरणाचे आम्ही चुंबन घेतो.आमची वृत्ती शांत झाली आहे त्या योगे आमचा ताप निरसला आहे व पापाचे निरसन होऊन आमची सर्व भेद बुद्धी संपली आहे.तुकाराम महाराज म्हणतात जिकडे पाहवे तो विठ्ठलच तिकडे दिसतो त्यामुळे आमचे व परक्याचे हे भेदच संपून गेले आहे.


अभंग क्र.७६०
राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एकचि सकळ दुजें नाहीं ॥१॥
मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंडचि खाणी एकी रासी ॥ध्रु.॥
मोडलें हें स्वामी ठायाठाव सेवा । वाढवावा हेवा कोणा अंगें ॥२॥
तुका म्हणे अवघें दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हेचि आतां ॥३॥

अर्थ

आता हे सर्व राज्य रामरूप झाले आहे,सर्व प्रजा रामरूप झाली आहे,सर्वत्र राम रूपच आहे,हे सगळे एकच आहे दुसरे काही नाही.माझी वाणी हि एक हरिनाम रूपी माल वाटणारी खान झाली आहे त्यामधून फक्त हरिरूप मंगळ वाणी प्रकट होत आहे.या अवस्थेमुळे “मी दास व तो स्वामी” हा भाव हि नाहीसा झाला,आता कशाची इच्छा वाढवावी?तुकाराम महाराज म्हणतात आता सर्व जग हे ईश्वर रूप बनले आहे त्यामुळे माझ्या अंतःकरणातून फक्त हरीचे प्रेम बाहेर पडते व तेच मी गातो.


अभंग क्र.७६१
निवडोनि वाण काढिले निराळे । प्रमाण डोहळे यावरी ते ॥१॥
जयाचा विभाग तयासीच फळे । देखणें निराळें कौतुकासी ॥ध्रु.॥
शूर तो ओळखे घायडायहात । येरां होईल मात सांगायाची ॥२॥
तुका म्हणे माझी केळवते वाणी । केला निजस्थानीं जानवसा ॥३॥

अर्थ

भक्तीचे अनेक प्रकार आहेत,ते निवडून काढावे व ज्याला ज्या प्रकारची आवड आहे त्याने त्याचा स्वीकार करावा.ज्याची जशी भक्ती असेल तसी त्याला फळाची प्राप्ती होईल,कवतुकाने पाहणाऱ्यास त्याला त्याचा आंनद मिळणार नाही.जो वीर असतो त्याला युद्धातील सर्व डाव पेच हे माहित असतात,इतरांना ती केवळ एक सांगण्यापूरती असते.तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी नवीन लग्न झालेल्या वधू प्रमाणे आहे नीज स्वरूपरुपी नवीन घरात राहण्याचा तिने निश्चय केला आहे,म्हणून मी जे काही बोलतो ते श्री हरीच्या कृपेने.


अभंग क्र.७६२
याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥

अर्थ

परमेश्वराची साधना आयुष्य भर केली ती याच साठी की शेवटचा दिवस गोड व्हावा.आता मी निश्चिंत होऊन विश्रांती पावलो आहे,आता सर्व प्रकारची हाव संपली आहे.मला तर याचेच मोठे कवतुक वाटते कि या हरीचे मंगल नाम मी सदैव घेतले त्या निमित्ताने मला आत्ता प्राप्त झालेले सध्या आणि माझी अवस्था याबद्दल असून मला जास्त कौतुक वाटत आहे पूर्वी मला हरिनाम घेण्याची वेड नव्हते त्या वेळेची अवस्था आणि आता हरिनामाने प्राप्त झालेली अवस्था याचे मला जास्त कौतुक वाटते आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मुक्तीशी लग्न केले आहे,उरलेले काही दिवस खेळी मेळी घालवायचे.


अभंग क्र.७६३
भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी । ब्रम्हीची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥
माउलीचे मागें बाळकांची हारी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥
जेथील जे मागे ते रायासमोर । नाहींसें उत्तर येत नाहीं ॥२॥
सेवेचिये सत्ते धनीच सेवक । आपुलें तें एक न वंची कांहीं ॥३॥
आदिअंत ठाव असे मध्यभाग । भोंवतें भासे जग उच्चांसनी ॥४॥
भावारूढ तुका झाला एकाएकीं । देवचि लौकिकीं अवघा केला ॥५॥

अर्थ

भक्तीच्या पोटात ब्रम्हपद,ज्ञान या रत्नांच्या खाणी आहेत.ज्या प्रमाणे आईच्या मागे बालकांची रीघ असते त्या प्रमाणेही या विठ्ठलच्या मागे भक्तांची रांग असते.राजा समोर कोणी काही जरी मागितले तर ते राजा देतो,तो कधीही नाही म्हणत नाही त्याच्या कडे नाही हे उत्तर नसते.सेवकाने जर धन्याची मनापासून सेवा केली तर तोच सेवक काही कालांतराने धनी बनतो कारण राजा त्याच्या सेवेला आतिशय भारावलेला असतो व त्याला सर्व अधिकार द्यायलाही काहीच विचार करत नाही.त्या प्रमाणे देवाच्या सेवेला जो कोणी नाही म्हणत नाही तो परमेश्वर त्याला ते सर्व अधिकार देतो मग तो सेवक एकदा कि उच्चासनावर बसला तर त्याला सर्व आदी मध्य अंत(उत्तम मध्यम कनिष्ट) कळते,तुकाराम महाराज म्हणतात मी भक्ती भावाच्या बळावर सिंहासनावर आरूढ झालो आहे,साऱ्या लौकिक गोष्ठी मला देव रूपच दिसत आहेत.


अभंग क्र.७६४
सांगतां दुर्लभ ज्ञानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटीं कैचा घडे ॥१॥
भजनाचे सोई जगा परिहार । नेणत्यां सादर चित्त कथे ॥ध्रु.॥
नाइकवे कानीं साधन उपाय । ऐकतो गाय हरुषें गीत ॥२॥
नव्हे आराणूक जावयासी वना । वेध कामिमना हरीकथेचा ॥३॥
काळाच्या साधना कोणा अंगीं बळ । चिंतना मंगळ अष्टप्रहर ॥४॥
तुका म्हणे आम्ही खेळों भातुकुलें । विभागासी मुलें भोळीं येथें ॥५॥

अर्थ

दुर्लभ अश्या ज्ञानाच्या गोष्टी सांगायलाच आहे, तर मग याचा अनुभव हृदयात येणे किती अवघड आहे?भजनाचे सहाय्य घेतले तर अज्ञानी लोकांच्या दुःखाचा परिहार होतो.त्यांनी या साधना शिवाय इतर साधना ऐकू सुद्धा नाही हरी गीत ऐकून हर्षाने आंनदाने ते गीत गावे.रानावनात जाऊन कष्ट करण्याची काही गरजच नाही,आणि ते सध्य हि होणार नाही,परंतु तामसी माणसाला हरिकथा ऐकता ऐकता वेध लागतो.दीर्घकाळाने प्रयत्न करून प्राप्त होणारी साधना हि करणे अवघड आहे त्या साठी कोणाच्या अंगात तेवढी शक्ती आहे?हरी भजनाला आठही प्रहर शुभ असतात.तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही हरिनामाचे खेळ खेळू,त्या खेळात भोळी पोरे भाग घेतात.


अभंग क्र.७६५
जाणपण बरें देवाचे ते शिरीं । आम्ही ऐसीं बरीं नेणतीच ॥१॥
देखणियांपुढें रुचे कवतुक । उभयतां सुख वाढतसे ॥ध्रु.॥
आशंकेची बाधा नाहीं लडिवाळां । चित्त वरी खेळा समबुद्धी ॥२॥
तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळा । अवकाशीं खेळा ठाव झाला ॥३॥

अर्थ

ज्ञानी पण हे देवाच्या जवळ असलेला बरा,आम्ही असेच अज्ञानी बरे आहोत.शाहण्या लोकांपुढे लहान मुळे खेळ खेळतात त्याचे सुख हे त्या शहाण्या माणसांना व त्या मुलांना दोघांनाही होते.शंकेची बाधा हि लडिवाळ मुलांना नसते त्यांचे संपूर्ण लक्ष हे खेळा कडेच असेते.तुकाराम महाराज म्हणतात भक्तांना सर्व दिशा सर्व काळ मोकळ्या असतात.


अभंग क्र.७६६
वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥१॥
जातां घरा मागें उरों नेणें खंती । मिळाल्या बहुतीं फांकलिया ॥ध्रु.॥
उदयींच अस्त उदये संपादिला । कल्पनेचा केला जागेपणें ॥२॥
जाणवूनि गेला हांडोरियां पोरां । सावध इतरां करुनी तुका ॥३॥

अर्थ

लहान मुले जर भातुकलीचा खेळ खेळावयास जमली तर त्यांचे सगळे पदार्थ हे शब्दांनीच तयार होतात.ते खरे असते का?तो खेळ संपल्यावर मुले घरी निधून जातात व नंतर त्यांच्या मनात तो भातुकलीचा खेळ देखील राहत नाहि.दिवसा ते आपल्या कल्पनेनेच रात्र झाली असे मानून झोपतात थोड्या वेळाने दिवस उगवला आहे असे कल्पना करून उठतात.तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचाचा असाच खेळ आहे म्हणून मी तुम्हाला सावध करतो आहे तुम्ही सावध व्हा हरी नाम घ्या.


अभंग क्र.७६७
याति शूद्र वैश केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य ॥१॥
नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥
संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥२॥
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥३॥
लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥
देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥
आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥६॥
कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥७॥
गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥
संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥९॥
ठाकला तो कांहीं केला परउपकार । केलें हें शरीर कष्टवूनी ॥१०॥
वचन मानिलें नाहीं सुहृदांची । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामी ॥१३॥
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१४॥
निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥
बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१६॥
विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१७॥
आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥
तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२०॥

अर्थ

मी शुद्र असलो, माझा व्यवसाय हा शुद्र असला तरी मी या विठोबाला पूज्य देव मनाला आहे.खरे म्हणजे हि गोष्ट सांगण्याची नाहि,परंतु तुम्ही संतानी हा प्रश्न केला म्हणून मी उत्तर देतो.संसाराला मी खरे मानल्या मुळे अति दुखी झालो आहे,शेवटी माझे आई बापही मला सोडून गेले.दुष्काळाने गरिबी आली समाजातील मान संपला,पत्नी अन्ना अचून मरण पावली.सर्व बाजूने आलेल्या संकटाने मी अतिशय दुखी झालो,माझी मलाच लाज वाटू लागली या वेळी धंद्यात तुट होऊ लागली.देऊळ पडके झाले त्याचा जीर्णोद्धार करावे अशी इच्छा मनात होती.प्रारंभी मी एकादशीच्या दिवशी कीर्तन करायाल सुरुवात केली,परंतु कीर्तनाच्या अभ्यासात माझे लक्षच लागत नव्हते.मग मीच मनाला समजावले,संताची वचणे पाठ केली.कीर्तने मध्ये जे कोणी ईश्वराचे वर्णन हर्षाने करणारे होते,त्याच्या पाठी मागे उभा राहून मी धृवपद म्हणत असायचो.संतांचे चरण तीर्थ पीत असे त्याची मला लाज नाही.माझ्या हातून होईल तेवढे उपकार मी करत होतो इतरांची सेवा करत होतो.म्हणून माझ्या शरीराला त्रास होत होता.मी आता माझ्या नातेवाईकांची वचने खरी न मानता संतांची वचने खरी मानली.लोकांचा खोटे पणा पाहून मला त्यांचा वीट आला.खरे आणि खोटे काय मी माझे ठरविले.या बाबतीत लोक काय म्हणतात याचा मी विचार करत नव्हतो.स्वप्नात मला सद्गुरूने मला उपदेश केला त्याचा मी अंगीकार केला नामावर विश्वास ठेवला.नंतर मला अभंगाची स्पुर्ती हृदयातून झाली.हरीचे चरण कमल मी घट्टधरले.काही लोकांनी माझा निषेध केला माझ्यावर अनेक प्रकारचे घात केले.त्याने माझे मन दुखावले होते. मी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या ह्या इंद्रायणी जळात बुडविल्या त्या वेळी मी तेरा दिवस तुमच्या जवळ धरणे धरून बसलो देवा,त्यावेळी तुम्ही माझे समाधान केले.आता मी सविस्तर जर सर्व सांगत राहिलो तर फार उशीर होईल देवा,आता पूरे झाले.आता आहे तसे आहे,पुढे काय होणार हे विठ्ठलाला माहित आहे.हा हरी माझ्या सारख्या भक्तांची कधी नुपेक्षा करणारा नाही हे मला माहित आहे,तो फार कृपावंत आहे हे हि मला कळले आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्व जीवन हे पांडुरंगच आहे,व इथे मी जे काही बोलतो आहे ते सर्व त्याच्या कृपेनेच बोलतो आहे.


अभंग क्र.७६८
ऐका वचन हें संत । मी तों आगळा पतित । काय काजें प्रीत । करीतसां आदरें ॥१॥
माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं । एकांचिये वांहीं । एक देखीं मानिती ॥ध्रु.॥
बहु पीडिलों संसारें । मोडीं पीसें पिटीं ढोरें । न पडतां पुरें । या विचारें राहिलों ॥२॥
सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें बहु तें ही । त्याग केला नाहीं । दिलें द्विजां याचकां ॥३॥
प्रियापुत्रबंधु । यांचा तोडिला संबंधु । सहज जालों मंदु । भाग्यहीन करंटा ॥४॥
तोंड न दाखवावे जना । शिरें सांदी भरें राणां । एकांत तो जाणां । तयासाठी लागला ॥५॥
पोटें पिटिले काहारें । दया नाहीं या विचारें । बोलावितां बरें । सहज म्हणें यासाठी ॥६॥
सहज वडिलां होती सेवा । म्हणोनि पूजितों या देवा । तुका म्हणे भावा । साठी झणी घ्या कोणी ॥७॥

अर्थ

हे संतानो मी एक पतित आहे,तुम्ही माझ्या वर ऐवढी प्रीती का बरे करता तेही आदराने,मी काय म्हणतो ते ऐका.माझे मन मला साक्षी आहे कि मी अजून हि या संसारातून तरलो नाही,एकाने मला मानके कि त्या पाठोपाठ मला दुसरा मानतो.या संसाराने मला फार पिडा होत आहे,मी शेतीत गेलो कि गुरु ढोरे यांना मी मारतो,हे करून देखील मला संसारात कमी पडते.त्या वेळेला मला परमार्थाने मला स्वस्थ केले.माझ्या कडे जे काही थोडे फार द्रव्य होते ते हि संपून गेले व उरलेले थोडे धन त्याच त्याग न करता ते मी जे याचक ब्राम्हण असयाचेत्यांना मी ते द्रव्य दिले.माझे पत्नी,मुले,बंधू यांना मी तोंड दाखविण्याच्या सारखा राहिलो नाहि इतका मी भाग्यहीन झालो.कोणालाही तोंड दाखवू वाटेना,कुठे सांदि कोपऱ्या मध्ये जाऊन बसावे असे वाटे,मग एकांत आवडू लागला.मला भूक लागली तेव्हा घरात काही नसल्याने मी निर्दयी झालो,कोणी हि मला जेवायला बोलावले तर मी हो म्हणू लागलो.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वाड वडिलांनी या पांडुरंगाची पूजा केली ती मी पुढे चालू ठेवली त्यामुळे या भावामुळे कोणीही मला महत्व देवू लागले.


अभंग क्र.७६९
बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥
अनुतापें तुझें राहिलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ध्रु.॥
बरें जाले देवा बाईल कर्कशा । बरी हि दुर्दशा जन मध्ये ॥२॥
बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥३॥
बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥४॥
बरें जालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं ॥५॥
तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासीं जागरण ॥६॥

अर्थ

देवा बरे झाले माझे दिवाळे निघाले आणि दुष्काळानेही मला चांगलाच त्रास दिला आहे ते खूप चांगले झाले. देवा मला पश्चाताप येत आहे आणि त्या पश्चातापाच्या निमित्तानेच मला तुझे चिंतन घडत आहे आणि संसार तर मला ओकलेल्या अन्ना प्रमाणेच वाटत आहे संसाराची मला आता घृणा येत आहे. देवा बरे झाले मला बायको देखील कर्कश मिळाली आणि जगामध्ये देखील माझी दुर्दशा होत आहे हे देखील चांगले झाले .देवा जगामध्ये पावलोपावली माझा अपमान होत आहे हे देखील बरे झाले माझे गुरे-ढोरे धन हे सगळे गेले तेही चांगले झाले. देवा बरे झाले मी लोकलज्जा धरली नाही वेळेच तुला शरण आलो हे फार बरे झाले. देवा मी माझे सर्वस्व तुला अर्पण केले व बायकोचा लेकरांचा त्याग केला हे फार बरे झाले. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी एकादशीव्रत धरले त्या दिवशी उपवास धरला आणि हरीचे भजन करून जागरण केले हे फार बरे झाले.


अभंग क्र.७७०
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥
बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥२॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥३॥

अर्थ

विठ्ठलाचे नाम घ्यावे,विठ्ठलाला डोळे भरून पाहावा,त्याच्यावर जीव अर्पण करावा.या विठ्ठलाच्या चरणांचि इतकी हाव लागली आहे की आता या प्रपंचाकडे मन माघारी धांव घेत नाही.मी संसाररूपी सागरातून मुक्त झालो आहे त्यामुळे मला विठ्ठलाच्या चरणांची सावकाश मिठी घेता आली आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या हृदयात विठ्ठल परिपूर्ण भरलेला आहे त्यामुळे काम आणि क्रोध यांनी माझे हृदय रुपी घर रिते केले म्हणजे खाली केले.


अभंग क्र.७७१
जग अवघें देव । मुख्य उपदेशाची ठेव ॥१॥
आधीं आपणयां नासी । तरि उत्तरे ये कसीं ॥ध्रु.॥
ब्रम्हज्ञानाचें कोठार । तें या निश्चयें उत्तर ॥२॥
तुका म्हणे ते उन्मनी । नाश कारय कारणीं ॥३॥

अर्थ

अध्यात्मातील प्रमुख उपदेश म्हणजे संपूर्ण विश्व हेच भगवंताचा लीला विलास आहे.प्रथम अहंकार नाहीसा कर म्हणजे मग,तू खऱ्या कसला लागशील.”अहम ब्रम्हास्मि” या उपदेशातच सर्व ब्रम्हज्ञानाचे भांडार भरले आहे.तुकाराम महाराज म्हणतात ज्या ठिकाणी कार्य आणि कारण हे भावच नाहीसे होतात तीच उन्मनी अवस्था होय.


अभंग क्र.७७२
मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥
आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥
जालों बरा बळी । गेलों मरोनि तेकाळीं ॥२॥
दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥

अर्थ

मीच माझ्या पोटी जन्माला आलो आहे,मी ब्रम्ह आहे या भावनेने माझा जन्म माझ्या पोटी झाला आहे.आता माझे नवस पूर्ण झाला आहे सर्व प्रकारची अशा निरसून गेली आहे. मी बलवान(मी ब्रम्ह आहे) झालो आहे तेव्हा माझी “मी देह” आहे हे वृत्ती नाहीशी झाली आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी ब्रम्ह असल्यमुळे प्रपंच व परमार्थाकडे साक्षी रूपाने पाहत आहे.


अभंग क्र.७७३
साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥१॥
पक्षियासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासीचि पावे ॥ध्रु.॥
भक्तीची जोडी ते उखत्याचि साठी । उणें पुरें तुटी तेथें नाहीं ॥२॥
तुका म्हणे आलें सांचत सांचणी । आजि जाली धणी एकसरें ॥३॥

अर्थ

पुरातन काळापासून ईश्वर प्राप्तीसाठी विविध कलांचा(साधनांचा) वापर केला जात होता त्या सर्वांचे मंथन करून एकच सार काढले आहे ते म्हणजे “भक्ती”.पक्ष्यांना त्यांच्या मार्गात काही अडथळा येत नाही उंचावर असल्यामुळे ते फळाला लवकर भिडतात.तसेच भक्तीचे आहे इतर साधने क्रमाक्रमाने हरीची प्राप्ती करून देतात पण भक्ती हि एक अशी साधना आहे कि तेथे काही कमी पडू देत नाही.भक्ती ने हरीची प्राप्ती लवकर होते.तुकाराम महाराज म्हणतात माझा पुण्याचा साठाच साचत आहे त्यामुळे आज भक्ती प्रकट झाली व हरीची प्राप्ती झाली.


अभंग क्र.७७४
नाहीं येथें वाणी । सकळां वर्णी घ्यावी धणी ॥१॥
जालें दर्पणाचें अंग । ज्याचा त्यासी दावी रंग ॥ध्रु.॥
एका भावाचा एकांत । पीक पिकला अनंत ॥२॥
तुका खळे दाणीं । करी बैसोनी वांटणी ॥३॥

अर्थ

सर्व प्रकारचे उच नीच साधकांनी ईश्वर लाभाची प्राप्ती करून घ्यावी भक्ती मार्गात कशचीच उणीव नसते भक्ती मार्ग असा असतो अगदी आरश्या प्रमाणे ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला फळ प्राप्त होते प्रतीबिंबासारखे. एक निष्ठ भक्तीभाव असला तर त्याठिकाणी हरी कृपेचे पिक अनंत असते.तुकाराम महाराज म्हणतात मी या भक्तीच्या पिकाचे खळे करून बसलो आहे व ज्याचा जसा भाव असेल त्याला त्या प्रकारच्या लाभाची वाटणी करत आहे.


अभंग क्र.७७५
ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥१॥
जयापासाव उत्पत्ती । तें हें बीज धरिलें हातीं ॥ध्रु.॥
निवडिलें वरळा भूस । सार आइन जिन्नस ॥२॥
तुका म्हणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥३॥

अर्थ

हरीच्या प्राप्तीचे नीज धन मी जतन करून ठेवले आहे.ज्यापासून सर्व जगाची उत्पत्ती आहे ते बीजच मी हाती धरले आहे.मी फोलपाट(भुसा) बाजूला सारून हरीची निवड केली आहे.तुकाराम महाराज म्हणतात तो नारायण माझ्या भाग्यात आला हे माझ्या संचिताचे गुण आहे.


अभंग क्र.७७६
भ्रमना पाउलें वेचतातीती वाव । प्रवेशाचा ठाव एका द्वारें ॥१॥
सार तीं पाउलें विठोबाचीं जीवीं । कोणीं न विसंभावीं क्षणभरि ॥ध्रु.॥
सुलभ हें केलें सकळां जीवन । फुंकावेचि कान न लगेसें ॥२॥
तुका म्हणे येथें सकळ ही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचें ॥३॥

अर्थ

सर्व साधनांच्या मागे फिरत राहण्यात भ्रमण करण्यात कायअर्थ आहे हरी कडे जाण्याचे द्वार तर एकच आहे. सर्व गोष्टीचे सार म्हणजे विठ्ठलाचे पाऊले ते आपल्या हृदयात स्थिर करावी कोणीही त्याला एक क्षणभर विसरू नये.हे सर्वात सोपे व उत्तम साधन आहे.यासाठी गुरुकडून कान मंत्र घेणे आवश्यक नाही.तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी सर्व इच्छा पूर्ण होत आहे.म्हणजे हरीचे चरणच सर्व विस्ताराचे मूळ खोड आहे.


अभंग क्र.७७७
कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहानें ॥१॥
भलतिया नावें आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥ध्रु.॥
अहंकार जातो गौरवितां वाणी । सर्वगात्रा धणी हरीकथा ॥२॥
तुका म्हणे उपजे विल्हाळ आवडी । करावा तो घडीघडी लाहो ॥३॥

अर्थ

पांडुरंगाशिवाय दुसरा काही विचार करू नये पांडुरंगा विषयी काही संदेह केला तर त्रास होईल.कोणत्याही नावाने जगाचा पिता विठ्ठलाला आळविले किंवा हाक मारली तरी तो आपल्या मनातील कळवळा जाणून घेत असतो.विठ्ठलाचे नाम आळवले तर आपली वाणी शुद्ध होवून सुरक्षित होवून अहंकार नाहीसा होतो. हरिकथेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात.तुकाराम महाराज म्हणतात आपल्या हृदयात पांडुरंगाची आवड कशी निर्माण होईल,याचाच विचार घडोघडी करावा.


अभंग क्र.७७८
बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥१॥
तया मूर्ख म्हणावें वेडें । कैसें तुटेल सांकडें ॥ध्रु.॥
दावितिया वाट । वेठी धरूं पाहे चाट ॥२॥
पुढिल्या उपाया । तुका म्हणे राखे काया ॥३॥

अर्थ

जमिनीची कुठल्याही प्रकारची निगा न करता(नांगरणी,खुरपणी,बि पेरणे इ.)जो फक्त फळाची अपेक्षा करतो,अशा माणसांना मूर्ख म्हणावे.त्याची पुढील संकटे कशी नाहीशी होतील?जो मार्ग दाखवितो त्यालाच वेठबीगारीला जो धरतो,असा माणूस निंद्य होय.तुकाराम महाराज म्हणतात पुढे ईश्वर प्राप्ती करून घेण्यासठी शरीराचे रक्षण करावे.


अभंग क्र.७७९
मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥
वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥
अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥२॥
तुका म्हणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥३॥

अर्थ

ज्या मातेच्या दुधापासून आपले रक्षण होते त्या मातेचे स्थन फाडणे जसे पापच आहे.त्याप्रमाणे वेदाला जो कोणी निंदितो तो चांडाळ,पापी,अज्ञानी आहे असे समजावे.जो स्वतः आपल्याच घरला आग लावतो तो कुठे विश्रांती घेणार?तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा वर्म जाणून घेतला पाहिजे इतरांना तर भ्रम नाचवितात.


अभंग क्र.७८०
वेश वंदाया पुरते । कोण ब्राम्हण निरुते ॥१॥
ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितों येविशी ॥ध्रु.॥
असा जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्धहीण ॥२॥
तुका म्हणे लोपें । सत्याचिया घडती पापें ॥३॥

अर्थ

आचार भ्रष्ट असलेले ब्राम्हणाने परिधान केलेला वेश म्हणजे फक्त त्यांना नमस्कार करण्यापुरता आहे. मग ते ब्राम्हण आहेत का?संताना हा प्रश्न मी विचारीत असून त्यांनी याचे मला उत्तर द्यावे सर्व ग्रंथात तुम्ही प्रवीण आहात तुम्हाला चांगले आणि वाईट कळते.तुकाराम महाराज म्हणतात सत्य लोपले कि पाप अपोआप घडते.


अभंग क्र.७८१
ज्या ज्या आम्हांपाशीं होतील ज्या शक्ती । तेणें हा श्रीपती अळंकारूं ॥१॥
अवघा पायांपाशीं दिला जीवभाव । जन्ममरणाठाव पुसियेला ॥ध्रु.॥
ज्याचें देणें त्यासी घातला संकल्प। बंधनाचें पाप चुकविलें ॥२॥
तुका म्हणे येथें उरला विठ्ठल । खाये बोल बोल गाये नाचे ॥३॥

अर्थ

आमच्यात असलेल्या सामर्थ्याच्या शक्तीने आम्ही श्रीपतीला अलंकार घालू.आम्ही त्या श्रीपतीच्या पायापाशी जीवभाव अर्पण केला आहे त्या योगाने आम्ही जन्ममरणाचा ठावठिकाणा पुसून टाकला आहे.आम्ही जो संकल्प केला होता तो संकल्प देवाला अर्पण केला असून बंधनाचे सर्व पाप चुकविले आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आता विठ्ठलाचा सर्व काही अर्पण केले त्यामुळेच केवळ विठ्ठलाच भरलेला आहे ,तो देईल ते आम्ही खातो त्याचेच बोल बोलतो त्याचीच गाणी गातो आणि त्याच्याच छंदात नाचतो.


अभंग क्र.७८२
आम्ही आळीकरें । प्रेमसुखाचीं लेंकरें ॥१॥
पायीं गोविली वासना । तुच्छ केलें ब्रम्हज्ञाना ॥ध्रु.॥
येतां पाहें मुळा । वास पंढरीच्या डोळां ॥२॥
तुका म्हणे स्थळ । मग मी पाहेन सकळ ॥३॥

अर्थ

आम्ही देवा जवळ हट्टाने मागणी मागणारे प्रेम सुख मागणारे लेकरे आहोत. आमच्या सर्व काही वासना या हरीच्या ठिकाणी असून ब्रम्हज्ञान देखिल आम्हाला तुच्छ आहे.पांडुरंग आम्हाला पंढरीवरून केव्हा बोलवील ह्याची आम्ही वाट पाहत आहोत.तुकाराम महाराज म्हणतात एकदा कि मला देवाने पंढरी क्षेत्राला नेले तर मग मी सर्व क्षेत्र स्थळ पाहीन.


अभंग क्र.७८३
आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥१॥
आतां सोडोनि भोजन । भिके जावें वेडेपण ॥ध्रु.॥
उसंतिली वाट । मागें परतावें फुकट ॥२॥
तुका म्हणे वाणी । वेचों बैसोन ठाकणीं ॥३॥

अर्थ

एखाद्या माणसासमोर आयते चालून पक्वनाचे ताट वाढून आले व तो ते ताट सोडून भिक मागावयास गेला तर तो मनुष्य वेडा ठरेल.एखादी वाट चालून आल्यावर परत मागे चालून जाणे हे व्यर्थ असते. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एका ठिकाणी बसून आवडीने हरीचे नाम घेवू.


अभंग क्र.७८४
धन्य शुद्ध जाती । धरीं लौकरी परती ॥१॥
ऐकिलें तोचि कानीं । होय परिपाक मनीं ॥ध्रु.॥
कळवळा पोटीं । सावधान हितासाठीं ॥२॥
तुका म्हणे भाव । ज्याचा तोचि जाणा देव ॥३॥

अर्थ

जो मनुष्य संसारातून परतीची वाट लवकर धरतो तो मनुष्य धन्य आहे,त्याची जाती व कुळ धन्य आहे.या आश्या मनुष्याच्या कानी परमार्थाचे नुसते काही विचार जरी पडले तर ते विचार त्याच्या मनात व हृदयात पूर्ण पणे ठसतात.त्याच्या हृदयात इतरां साठी कळवळा उत्पन्न होऊन तो इतरांच्या हितासाठी जागा होतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनामध्ये सं रविषयी आदर आहे आणि परमार्थ विषयी चांगले विचार आहे तोच देव आहे असे समजावे.


अभंग क्र.७८५
जीवित्व तें किती । हेचि धरितां बरें चित्तीं ॥१॥
संत सुमनें उत्तरें । मृदु रसाळ मधुरें ॥ध्रु.॥
विसांवतां कानीं । परिपाक घडे मनीं ॥२॥
तुका म्हणे जोडी । होय जतन रोकडी ॥३॥

अर्थ

आपले आयुष्य ते किती आहे,हे आपल्या चित्तात धरले तर बरे.संतांची शब्दरूपी सुमने म्हणजे फुले हि मृदु रसाळ आणि मधुर आहेत.ती वचने ऐकली तर मनतृप्त होऊन परिपक्व होते.तुकाराम महाराज म्हणतात ज्याने रोकड हातात येते ते साधन संग्रहात ठेवावे हे बरे.


अभंग क्र.७८६
अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व येती सकळ ॥१॥
कळोनि ही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥ध्रु.॥
सर्व सत्ता धरितां धीर । वीर्‍या वीर आगळा ॥२॥
तुका म्हणे तिखट तिखें । मृद सखे आवडी ॥३॥

अर्थ

अभिमानाची निवृत्ती हि शांतीनेच होत असते,त्यामुळे एका शांतीने सर्वांना महत्व मिळते.सर्वांना हे माहित असून त्याचे अनुकरण कोणीही करत नाही,त्यामुळे सर्वांना कष्ट होतात.परमार्थात धीर जो कोणी धरतो तोच सर्वां मध्ये महावीर आहे असे समजलेच पाहिजे.तुकाराम महाराज म्हणतात संत हे जे कोणी त्यांच्याशी तिखट प्रमाणे वागतात त्यांच्याशी ते कठोर वागतात आणि जे त्यांच्याशी कोमल प्रमाणे वागतात ते त्यांच्याशी अति कोमलतेने वागतात असतात आणि तितकेच मृदू आणि मधुर असतात,म्हणूनच तर ते माझी सखी आहेत, मला फार आवडतात.


अभंग क्र.७८७
भोजन पा शांतीचें । उंच निच उसाळी ॥१॥
जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥ध्रु.॥
कल्पना ते देवाविण । करी भिन्न इतरीं ॥२॥
तुका म्हणे पावे भूती । ते निंश्चिती मापली ॥३॥

अर्थ

भोजन असे सेवन करावे जेणे करून मनाला शांती लाभली पाहिजे,मनात शांतीच्या लाटा उसळल्या पाहिजे.ज्या प्रमाणे कारंज्याचे पाणी हे उंचच उंच उडते तसा प्रेमाचा जिव्हाळा मनात हवा म्हणजे स्वहित लाभेल.देवाविण इतर कोणतेही विचार मानत येऊ देऊ नका.तुकाराम महाराज म्हणतात शांतीचे स्वरूप मी तुमच्या समोर आता मांडले आहे.


अभंग क्र.७८८
दास झालों हरीदासांचा । बुद्धीकायामनें वाचा ॥१॥
तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ ।
नासे दुष्टबुद्धी सकळ । समाधि हरीकीर्त्तनीं ॥ध्रु.॥
ऐकतां हरीकथा । भक्ती लागे त्या अभक्तां ॥२॥
देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥३॥
हें सुख ब्रह्मादिका । नाहीं नाहीं म्हणे तुका ॥४॥

अर्थ

काय,वाचा,मानाने व बुद्धीने मी हरी दासांचाही दास झालो आहे.जेथे प्रेमाचा सुकाळ आसतो,टाळ मृदुंगाचा जय घोष असतो,तेथे दुष्ट बुद्धी नाहीशी होते,व हरी कीर्तनात समाधी लागते.हरी कथा ऐकल्याने अभक्तालाही भक्ती उत्पन्न होते.कीर्तनाचा रंग पाहून पांडुरंग तेथे कसा उभा राहतो ते पहा?अश्या प्रकारचे सुख हे देवादिकांनाही मिळत नाही असे महाराज दोन वेळा सुचवतात.


अभंग क्र.७८९
गति अधोगति मनाची हे युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥१॥
जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥
मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तेचि करी ॥२॥
तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौऱ्यांशीचा ॥३॥

अर्थ

गती अधोगती हि मनाचीच युक्ती आहे,त्यामुळे मन हे एकांती व साधूच्या संगतीत लावावे.या मनाचे जतन करा या मनाचे जतन करा ते ओढाळ जनावरा प्रमाणे सैरावैरा इतस्तः धावत आहे.मान आणि अपमान हे मनाच्या वृत्तीचे लक्षण आहेत,त्यामुळे मनाला ज्या प्रकारचे ध्यान लावावे तेच ते करते.तुकाराम महाराज म्हणतात अहो माझे बंधुंनो हे मनच आहे की जे आपल्याला भवसागरातून उतरवते आणि हे मनच आपल्याला चौर्‍यांशी लक्ष योनीच्या फेऱ्यात बांधून टाकते.


अभंग क्र.७९०
पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥
पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥
उदिमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥२॥
पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥३॥
तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥४॥

अर्थ

पंढरीस दुखः हे औषधालाही मिळत नाही कारण सुख पांडुरंग रूपाने तेथे असल्या मुळे.पंढरीत पेठ हि पुंडलीकाने वसवली असून त्याने सर्व वैकुंठच या पृथ्वीवर आणले आहे.या ठिकाणी कोणत्याही धंद्याला काहीच तोटा नाही,सर्वांना फायदाच फायदा आहे.या पेठेत सर्व देशाला पुरेल एवढा माल आहे तो माल शीग पर्यंत भरलेला आहे.या मालाने सर्व पंचक्रोशी दुमदुमून गेली आहे.तुकाराम महाराज म्हणतात संतांना पंढरीत तृप्ती मिळाली आहे,कारण कारण त्यांना येथे पांडूरंगाच्या प्रेम सुखाचा लाभ प्राप्त झाला आहे म्हणून ते पंढरीत बसून राहिले आहेत.


अभंग क्र.७९१
द्वारकेचें केणें आलें याचि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥१॥
गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥
वैष्णव मापारी नाहीं जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥२॥
लाभ जाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांठविलें ॥३॥
तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥४॥

अर्थ

भक्त राज पुंडलिक हा लोकांना सांगत आहे कि द्वारकेतून श्री कृष्ण रुपी माल या पंढरीच्या बाजारात आला आहे.भक्तांनी विसार देवून श्री कृष्ण रुपी माल हा ताब्यात घेतला आहे.त्याचे माप खरे केले आहे व त्याची किंमत मोजली आहे त्या कारणाने तो परमात्मा अजून माघारी पाहत नाही.वैष्णव जन त्याचे माप घेतात,परंतु त्याचे काही मोज माप च होवू शकले नाही आणि पुढे त्याचा काही पत्ता लागत नाही.ज्यांनी तो माल घेतला त्यांनी त्या मालाचा विचार करून इहलोक व परलोकी तो माल साठविला आहे.तुकाराम महाराज म्हणतात मला मजुरी मिळाली आहे आणि माझा संतांवर पूर्ण विश्वास आहे.


अभंग क्र.७९२
सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥१॥
साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥
पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥२॥
निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रह्मानंदु ॥३॥
तुका म्हणे ज्यापें नाहीं पुण्यलेश । जा रे पंढरीस घेई कोटि ॥४॥

अर्थ

सर्व देवी देवता हि या पंढरपुरी तीर्थी चंद्रभागारूपी शुद्ध पेठेत येतात.हि गोष्ट सांगू वांगी नसून प्रत्यक्ष माझा अनुभव आहे या पेठेचा अद्भूत महिमा वर्णानच करता येत नाही.या पंचक्रोशीमध्ये दोषांचा विषय येतच नाही आणि जरी फार मोठा दोष असला तरी तो इथे आल्यावर अपोआप जळून जातो.येथील सर्व पुरुष आणि स्त्रीया चतुर्भुज व निर्विषय देवा प्रमाणे विषयहीन आहेत.येथे सर्व घरोघरी ब्रम्हानंद आहेत.तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या जवळ पुण्याचा लवलेश हि नाही त्यांनी पंढरीस जावून कोटी कोटी पुण्य घावे.


अभंग क्र.७९३
विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥१॥
वादावाद करणें त्यासी तोचि वरी । गुखाडीची चाड सरे तोंचि बाहेरी ॥ध्रु.॥
सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । छी करूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥२॥
नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥३॥

अर्थ

जो मनुष्य विचार शून्य आहे तो गाढवासमान आहे तो ब्रम्हज्ञानी जरी असला तरी त्याचे शब्दज्ञान हे बैलाच्या पाठीवरी ओझ्या प्रमाणे आहे.त्याला वादावाद करणे आवड असून कायम बाह्यारूपी विष्ठा खाण्याची सवय असते.तो कितीही श्रीमंत असला,विद्वान असला तरी पायाला लागलेली घाण जशी छी करून काढून टाकावी त्याप्रमाणे त्याचा त्याग करावा. तुकाराम महाराज म्हणतात त्याचे कुळ कितीही उच्च असले तरी लक्षात घेवू नये आणि त्याची माळ मुद्रा इत्यादी लक्षणे खोटी आहेत हे समजावे,ती काय जाळायची आहेत?


अभंग क्र.७९४
देव होसी जरी आणिकांते करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥१॥
दुष्ट होती तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥२॥
तुका म्हणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥३॥

अर्थ

जर तू देव झालास तर तू दुसऱ्याला देव करशील यात कोणतीही शंका नाही.जर तू दृष्ट झाला तर तू दुसऱ्याला हि दृष्ट करशील यातही काही शंका नाही.तुकाराम महाराज म्हणतात जसे आरश्यात दिसते तसेच बाहेर असते त्याप्रमाणे माणसाचा स्वभाव कसा असतो हे त्याच्या वागण्यावरू समजते यात काही शंका नाही.


अभंग क्र.७९५
कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥
तेंचि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥
तप व्रत करितां लागती सायास । पाळितां पिंडास गोड वाटे ॥२॥
देव म्हणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥३॥
तुका म्हणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥४॥

अर्थ

कलयुगामध्ये भ्रष्ट ब्राम्हण आपला आचार विचार टाकतील असे पूर्वी संतानी सांगितले आहे.त्याचीच प्रचीती आता येत आहे सर्वानीच अधर्माचा आश्रय घेतला आहे.शास्त्रात सांगितलेली तप,साधना,तपश्चर्‍या ,व्रते करण्यात खूप कष्ट पडतात म्हणून हे लोक आपला देह पाळतात.आपणच स्वतः देव आहे असे समजून देवळात जात नाहीत,मग ते संसारा वेगळे का राहत नाही?तुकाराम महाराज म्हणतात मी जर यांची परवा करून गप गुमान राहिलो तर ते योग्य नाही कारण हे प्राणी नरकात जातील.


अभंग क्र.७९६
नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥
तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥२॥
ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥३॥
तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥

अर्थ

हे विश्वरूप असणाऱ्या विष्णू मायबापा मी तुला वंदन करतो तू अनंत आणि अपार आहेस मी तुझा रंक दास तुला विनंती करतो ते तू ऐकावे.तुझी स्तुती करताना वेद देखील थकला “नेती नेती” म्हणत स्वस्त बसला.बहुत ऋषी,मुनी,संत कविजन तुझे गुणगाण गात आहेत वर्णन करत आहेत परंतु त्यांनाही पूर्ण पणे तुझे वर्णन सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुझी कीर्ती वर्णन करता येईल अशी माझ्या वाणीची काय शक्ती?


अभंग क्र.७९७
अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥
घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥
मज याचकाची पुरविली आशा । पंढरी निवासा मायबापा ॥२॥
नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥३॥
तुका म्हणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥४॥

अर्थ

माझ्या अंतरीचा गुजभाव या पांडुरंगाने जाणला व तशी कृती केली.आम्ही जे शब्द तुझी स्तुती करण्यासाठी वापरले ते खाली पडले नाही तू आम्हा अनाथांची माऊली आहेस.हे पंढरीनाथा मायबापा माझ्या याचकाची तू अशा पुरविली.माझ्या मनात जी भेदाची शंका होती तू तिचा नाश केला आहेस.तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या कृपेने तू मला निर्भय केले आहेस आता मी तुझे अपार गुणगान गात राहील.


अभंग क्र.७९८
उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥१॥
सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरलीं वाचा काया मनें ॥ध्रु.॥
पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावें ॥२॥
चालतां ही पंथ सांभाळिसी वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥३॥
तुका म्हणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥४॥

अर्थ

तू हे विठ्ठला तू उदार आहेस,कृपाळू आहेस,तू अनाथांचा नाथ आहेस.तुला जे शरण येतात त्यांचे म्हणणे तू ऐकतोस तू त्यांचा सर्व भार आपल्या माथ्यावर घेतोस कारण ते तुला काया वाचा मनाने शरण आले आहेत.त्यांनी तुला पाचारीता(हाक मारली)तर तू लगेच धवत त्यांच्या जवळ उभा राहतोस त्यांना पाहिजे त्यावेळेस, पाहिजे ते पुरवतोस ते मार्गाने चालत जरी असले तरी त्यांचा सांभाळ हि तूच करतोस त्यांच्या मार्गाचे काटे खडे वैगरे तू तुझ्या हाताने बाजूला सारतोस. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तुझ्या दासांना कुठल्याही प्रकारची चिंता नाही.कारण तू त्यांची सर्व प्रकारे रक्षण करतोस.


अभंग क्र.७९९
काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥१॥
मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥
होईल थोरपणें जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥२॥
अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥३॥
तुका म्हणे तुझे पाय आतुडती । त्या मज विपत्ती गोड देवा ॥४॥

अर्थ

मान सम्मान कीर्ती व लौकिक याचे काय करावे?मला तू तुझे चरण दाखव.देवा मी तुझा दास आहे मी वाया जाईन असे काही तू करू नकोस मला ज्ञानाचा भार देवून थोर पण येईल. असे झाले तर मी तुझ्या चरणापासून दूर जाईल.माझ्या अंतरीचा भाव हा लोकांना काय कळणार? तुकाराम महाराज म्हणतात मला साधू समजून एक पाया पडतो व ते पाहून दुसरा पण माझ्या पाया पडतो ज्या योगाने तुझे पाय मला सापडतील असे तू कर मग मी दरिद्री राहिलो तरी चालेले.


अभंग क्र.८००
मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं हे माझिया जीवा चाड ॥१॥
तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥
करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उशीर आतां देवा ॥२॥
नव्हे साच कांहीं कळों आलें मना । म्हणोनि वासना आवरीली ॥३॥
तुका म्हणे आतां मनोरथ सिद्धी । माझे कृपानिधी पाववावे ॥४॥

अर्थ

मला समाजात मन सम्मान मिळावा माझ्याकडे द्रव्य असावे असे मला वाटत नाही याचि मला इच्छा हि नाही.तुझ्या पायासाठी तर मी सर्व अराणुक(आपेक्षांना शांत) केली आहे.आता मला दुसरे काही नको.आता तू माझ्यावर कृपा कर व माझा अंगीकार कर उशीर लावू नकोस.तुझ्या शिवाय दुसरे काही खरे नाही हे मला कळले आहे म्हणून माझी वासना आवरली आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपानिधे आता माझे मनोरथ तूच पूर्ण करा. 


सार्थ तुकाराम गाथा ७०१ ते ८००

3 thoughts on “सार्थ तुकाराम गाथा 701 ते 800”

  1. उल्हास हेजीब

    अप्रतिम ! आपल्या चरणी सादर साष्टांग नमन !

  2. खूप छान अभंग आहेत मी पूर्ण गाथा वाचण्याचा प्रयत्न करत आहे.तुम्ही जो अभंगाचा अर्थ दिलेला
    आहे तो मला खूप खूप आवडलेला आहे.मी तुमचा कोटी कोटी आभरी आणि ऋनी आहे.असच काम चालू ठेवा तुम्हाला खूप मोठी पुण्याई भेटेल विठॣमाऊली तुमचं कल्याण करो.

  3. खूप छान अभंग आहेत मी पूर्ण गाथा वाचण्याचा प्रयत्न करत आहे.तुम्ही जो अभंगाचा अर्थ दिलेला
    आहे तो मला खूप खूप आवडलेला आहे.मी तुमचा कोटी कोटी आभरी आणि ऋनी आहे.असच काम चालू ठेवा तुम्हाला खूप मोठी पुण्याई भेटेल विठॣमाऊली तुमचं कल्याण करो. जय हरी विठ्ठल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *