संत चोखामेळा (chokhamela) (जन्म:अज्ञात वर्ष – मृत्यू: इ.स. १३३८) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. चोखामेळांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. (चोखामेळांचा जन्म पंढरपूरलाझाल्याचे संत महिपती सांगतात.
चोखामेळा मूळ वर्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखामेळांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
संत चोखामेळा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखामेळा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्र्य, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखामेळा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ … असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखामेळांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.
संत चोखामेळांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न, संवेदनक्षम, भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखामेळांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात.
‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणार्या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दुःख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखामेळांचे सुमारे ३५० अभंग सध्या उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम ‘अभ्यंग अनंतभट्ट’ हे करत असत, असा उल्लेख काही संशोधक करतात.
संत चोखामेळा – आख्यायिका
चोखामेळांविषयी बऱ्याच आख्यायिका आहेत चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावंचे रहिवाशी. ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी शके १२०० साली आले. पंढरपूरी आल्यानंतर त्यांना विठठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरी भरभराटीस आली होती.
शके १२६० ला मंगळवेढ्यातील वेशीच्या तटाची भिंत कोसळली होती. व तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी दूत पंढरपूरी आला. आणि त्या मजुरासोबत चोखामेळा तटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी सहकुटुंब मंगळवेढ्यास आले .संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग होते.त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्ती परायण होते. त्या सर्वांचे श्रीविठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते.
त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वत: विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखामेळांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग- रचना आहेत. संत चोखामेळांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत.
संत चोखामेळांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वत:ला ‘विठू पाटलाचा बलुतेदार, म्हणून समजत असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्र्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते.
किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असता ते एकाएकी कोसळले व त्याखाली श्री चोखामेळाराया आणि अनेक मजूर मयत झाले ही घटना शके १२६० म्हणजे इ.स. १३३८ मध्ये वैशाख वद्य पंचमीस झाली. पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले व ज्या अस्थिमधून विठ्ठ्ल विठ्ठ्ल असा आवाज होता त्या अस्थि श्री चोखामेळारायांच्या आहेत असे ओळखून त्यांनी त्या पंढरपूरी विठठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरी जवळ समाधी बांधली.
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
Verry nice…