संत कान्हो पाठक माहिती

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एक गाव ‘केंदूर‘ या गावी श्री ज्ञानेश्वर महाराज ज्यांना अत्य़ंत आपुलकीने व आदराने ‘काका’ म्हणत असे कान्हुराज वारकरी संप्रदायातील थोर संत होते. संत कान्हो पाठक हे यर्जुवेदी कुळातील ब्राम्हण होते व त्यांना राजमान्यता ही होती.

कान्होपाठक सिध्दयोगी होते म्हणून ज्ञानेश्वराच्यां समाधीच्या वेळी संत नामदेव महारांज यांना दु:खाचा गहिवर अवरेना त्यामुळे नामदेव किर्तन करु शकले नाहित तेव्हा सर्व संतानी ज्ञानेश्वराच्यां समाधीचे किर्तन कान्हो महारांज पाठक यांना करण्यास लावले.

सद्गुरु नागेशांनी दृष्टांत देऊन कान्होराजास जंगलात जाऊन साधना करावी अशी आज्ञा केली. त्यानुसार ते केंदूर गावाजवळील पिंपळखोरे येथील जंगलात ओढ्याकाठी एका शिळेवर बसुन तपःश्चर्या करत त्यातुन त्यांना अनेक सिध्दि प्राप्त झाल्या. मग पुढे ते गुरुग्रही वेदांत अध्ययनासाठी गेले व तेथील अध्ययन फार थोड्या अवधीत कुशाग्र बुध्दी व एकपाठी असल्याने पुर्ण केले. पुढे आई – वडिलांनी त्यांचा विवाह लावून दिला. अतिशय सुशील व गुणवान असणार्‍या सुनेमुळे सासु – सासरे सुखावले. कान्होराजांचा संसार सुरळीत चालु झाला पण जन्मतःच विरक्त असणारे कान्होराज संसारत कसे रमणार? पुनः पिंपळखोरीत जाऊन साधना सुरु झाली व उरलेल्या वेळात समाजात धर्माचरण व शास्त्रमार्गाबद्दल उपदेश प्रचार करत असत. अशा रितीने १० – १२ वर्षांचा काळ गेल्यावर आईवडिल व आप्तजनांच्या आग्रहामुळे त्यांना दुसर्‍या विवाहास सामोरे जावे लागले. दोन्ही पत्नी एकत्र अतिशय आनंदाने रहात होत्या त्यामुळे त्यांचा प्रपंच अतिशय सुखात चालला. कालांतराने माता – पित्याचे छत्र हरपले. सद्गुरु कृपेने संसारात राहुन शुध्द शास्त्राप्रमाणे आचरण ठेऊन समाजापुढे आर्दश ठेविला.


संत कान्हो पाठक – आणखी माहिती

महाराष्ट्र ग्रंथकार, हे केदूर पाबळ (पुणें जिल्हा) येथील रहिवासी असून वृत्यंशी जोशी होते.  यांचे घराणें पूर्वीपासून विद्वानांचें होतें.  याची वंशावळ सांपडते ती पिलापाठक, त्यांचे त्रिमल व त्यांचे कान्हो होत कान्होचे पुत्र हरि व नातु नामा पाठक होते.  हे यजुर्वेदी वाजसनेयी शाखेचे होते.  हे ज्ञानेश्वराच्या वेळीं ह्यात असून त्यांच्या लोभांतील होते.  ज्ञानेश्वरांनी समाधि घेतांना आपली सारी चीजवस्त यांनां दिली अशी वारकरी मंडळींत अद्यापि समजूत आहे.  अजूनहि ज्ञानेश्वरांच्या आरतीच्या वेळी विडा खिरापतीचा मान यांच्या वंशजाकडे आहे.

यांचा एक गीतासार नांवाचा ग्रंथ व इतर काव्य उपलब्ध आहे. 

गीतासारावरून यांच्या गुरूचें नांव नागनाथ होतें असें समजतें.

हे विरक्त होते.  काशीचा एक पंडित यांच्या दर्शनास आला असतां हे मुलाला खेळवीत होते.

तें पाहून त्यानें मायापाश अजून सुटला नाही काय ? असें म्हणतांच यांनीं मुलाला समोरच्या विहिरींत फेंकून दिलें.

त्यास पुढें लोकांनी काढलें.  कान्हो त्रिमलदास असेंहि कोठें कोठें आढळतें तें यांचेच दुसरे नांव असावें.

यांच्या वडिलांचे नांव त्रिमल होतें.  कान्हो त्रिमलदासांनी पाताळकांड म्हणून एक ग्रंथ केला आहे.

त्यांत त्यांनी वडवाळसिद्ध नागेशाचें गुरू म्हणून नांव दिलें आहे.

वरील नागनाथ व हे वडवाळसिद्ध नागनाथ एकच असतील.  पाताळकांडांतील कथा जरा चमत्कारिक आहे ती अशीः-

‘इंद्रजिताच्या मरणानंतर सुलोचना हिने सती जाण्यापूर्वी आपल्या उदरीं असलेला गर्भ सागरांत टाकला व तो ‘गिलगिल’ व ‘शशी’ या दोन मत्स्यांनीं गिळिला.

त्यापासून आलोटकेतु व पाताळकेतु असे दोन पुत्र उत्पन्न झाले.

त्यांनी रामसंस्थापित बिभीषणास हांकून देऊन लंकेचें राज्य घेतलें.

पुढें इंद्र, ब्रह्मा, महेश, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, लवांकुश यांच्याशीं त्यांची लढाई होऊन तींत पाताळ केतू व आलोटकेतू यांचा जय झाला.

शेवटीं रामाची व त्यांची गांठ पडून शत्रुघ्नानें रामाच्या सूचनेनें पातालकेतूचा वध केला.

रामानें जो एक बाण सोडला तो असह्य होऊन आलोटकेतु पळत सुटला तो अद्याप आकाशांत ध्रुवास प्रदक्षिणा घालीत आहे;

व रामाचा बाण त्याच्या मागें आहे.  बाणास रामाची आज्ञा कीं, ”आलोटकेतु” सन्मुख झाला कीं त्याच्या ललाटाचा वेध करावा.”

वैर्‍यांचा पराभव करून राम बिभीषणास पुनःलंकापति करून अयोध्येस परत आले.”

अशीं ही आलोटकेतू व पाताळकेतूंची कथा आहे.  या कथेचें मूळ समजत नाहीं.

वाल्मिकी किंवा एकनाथी रामायणांत ही कथा नाही.

याचे नातु नामा पाठक यांनी नामापाठकी अश्वमेध म्हणून एक ग्रंथ केला असून नामरत्‍नमाला,

भरतभेट वगैरं लहानसहान प्रकरणेंहि केलेलीं आहेत.  (अ.कोश; इति.मं.अह.१८३६; सं.क.सूचि).


हे पण वाचा: संत ज्ञानेश्वर यांची संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: ketkardnyankosh, yamaidevi

5 thoughts on “संत कान्हो पाठक माहिती”

  1. Vaishali Chipalkatti

    खूप छान,,, सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध झाल्यामुळे आता त्यांच्या बद्दल ची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.

  2. रंजना दिलीप पाटील

    संत कान्होपाठक यांनी त्यांच्याच घराण्यात 21 व्या पिढीत पुन्हा अवतार घेतला होता. त्यांचे नाव राजाभाऊ राजपाठक. हे सुध्दा सत्पुरुष होते. त्या.नी अनेक चमत्कार केले व नागेश संप्रदायाचा प्रसार केला्. त्यांची समाधी केंदूर येथे आहे. यांचे अवतार कार्य 21 व्या शतकातच समाप्त झाले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *